सुदाम गाडेकर जालना
जालना :पाऊस सुरू होऊन अडीच महिन्यांपेक्षा अधिकचा काळ संपत आला आहे, मात्र राज्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. पीक पावसा अभावी डोळ्या देखत करपून जात आहे . शेतात खूप मोठा खर्च केला गेला आहे. पाऊस नसल्याने पिकांनी माना टाकल्या आहे . तलाव कोरडे ठाक पडले आहे . मराठवाड्यवर भीषण पाणी टंचाई निर्माण हो होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जनावरांना चारा टंचाई निर्माण होऊ शकते . आशा परिस्थिती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे . एकीकडे पाऊस नसल्याने शेतकऱ्यावर मोठं संकट आले आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटीसा पाठवल्या जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांच्या नोटीस
जून महिना कोरडा गेला, जुलैत थोडाफार पाऊस झाला, त्यात आता ऑगस्ट महिन्यात देखील पावसाचा खंड पडला. गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर पिकांना वाचवणं अवघड झालं आहे. त्यातच राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे, आता बळीराजावर आणखी एक सुलतानी संकट आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी बँकांकडून थेट नोटिसा पाठवल्या जात आहे. एवढेच नाही तर कर्ज न भरल्यास खटला दखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील बँकांनी दिला आहे
एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे कर्जाचा डोंगर
पैठण तालुक्यातील बालानगर गावातील रामनाथ गोर्डे यांचं घर शेतीवर चालतं. पण, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी ढोरकिन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतीसाठी 25 हजाराचं कर्ज घेतलं. शेतीतून होणाऱ्या उत्पन्नातून हे कर्ज ते फेडणार होते. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर, कधी परतीच्या पावसाने शेती नेहमी तोट्यात राहिली. त्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पीकं उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच आता गोर्डे यांना बँकेने नोटीस पाठवून शेतीसाठी घेतलेलं कर्ज भरण्याचा तगादा लावला आहे. 25 हजाराचं कर्जाचे व्याजासह 41 हजार रुपये भरण्याच नोटीसेतून सांगण्यात आलं आहे. तसेच तीस दिवसात हे कर्ज न फेडल्यास कारवाईचा इशाराही दिला आहे.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार?
ही परिस्थिती एकट्या गोर्डे यांचीच नसून, अशा अनेक शेतकऱ्यांना आता बँकांच्या नोटीस येऊ लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदार संघातील शेतकऱ्यांना या नोटीसा आल्या आहेत. राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं आश्वासन देत आहे . आता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर कसे उभे राहते हे पाहणे आहे .