अहमदनगरचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौंडी येथे घोषणा

0

जामखेड : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक  अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे नाव देण्याचे काम आमच्या काळात होते.हे आमचे भाग्य आहे.असे प्रतिपादन राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्रा जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील जन्मगाव चोंडी येथे जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी वरील घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विके, सदाशिव लोखंडे, आमदार प्रा राम शिंदे,गोपीचंद पडळकर, बबनराव पाचपुते, सुरेश धस, मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजीमंत्री अण्णासाहेब डांगे, प्रा लक्ष्मणराव ढोबळे, माजी खासदार विकास महात्मे, माजी आमदार नारायण पाटील, रामहरी रूपनवर , पोपटराव गावडे, ,अनंतकुमार पाटील, रावराव वडकुते, भिमराव धोंडे, बाळासाहेब मुरकुटे , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील वंशज बाबासाहेब शिंदे पाटील, उज्वला हाके ,डाॅ.शशिकांत तरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले , अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हिमालयाच्या उंचीचे होते, नामकरणामुळे नगरचे नावही हिमालयाएवढे उंचावणार असल्याचे सांगून, मुख्यमंत्री शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला तसेच या नामकरण सोहळ्याचे साक्षीदार होता आले हे सरकारचे व आमचे भाग्य असल्याचा उल्लेखही केला. दोन वर्षांनी अहिल्यादेवींची ३०० जयंती होत आहे, ही जयंती भव्य स्वरूपात व सर्वांना हेवा वाटेल अशी साजरी केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे आदर्शावर आम्ही राज्य कारभार करत आहेत. 

अहिल्यादेवींच्या मागच्या वर्षीच्या जन्मोत्सवात अहिल्यादेवी भक्तांना खूप त्रास झाला, मात्र, त्यानंतर २० दिवसातच आम्ही सरकार उलथून टाकले, असे सूचक भाष्य मुख्यमंत्री शिंदे यांनी मविआ सरकारचे नाव न घेता करताच उपस्थितांनी जल्लोष करीत प्रतिसाद दिला.

 राज्यात सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करत आहोत. अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले ,  धनगर समाजासाठी शेळी मेंढी सहकार विकास महामंडळाची स्थापना करून, १० हजार कोटी रूपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सरकार हिंदुत्ववाद्यांचे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर व धाराशिवचे नामकरणाचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे अहमदनगरच्या नामकरणही झालेच पाहिजे, मुख्यमंत्री त्यासंदर्भातील निर्णय घेतील. आपण मुख्यमंत्री असताना धनगर समाजासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी दिला होता. मात्र मध्यंतरी सरकार बदलल्यावर धनगर समाजाला एक फुटकी कवडीही दिली गेली नाही. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. धनगर समाजासाठी दरवर्षी २५ हजार घरे बांधली जाणार आहेत. धनगर समाजाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी मला व मुख्यमंत्री शिंदे यांना अहिल्यादेवींचा आर्शीवाद मिळो .अशी सदिच्छा व्यक्त केली. अहिल्यादेवींच्या ठाही संघर्ष होता. तो आपल्याला समाजाच्या उत्कर्षासाठी करावा लागेल. धनगर समाजाच्या मनातील सर्व मागण्या आम्ही पुर्ण करणार आहोत. राज्यातील एकही धनगर बेघर राहणार नाही. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.तसेच राखीव चराई क्षेत्र ,धनगरवाड्यांना जोडणा-या रस्त्यांची तरतूद केली आहे. अहिल्यादेवी नसत्या तर या देशात काशी आणि शिवाची मंदिरे दिसली नसती. त्यांनी पायाभूत सुविधा उभारून सामान्य माणसाला न्याय दिला.न्यायप्रिय शासन त्यांनी चालवले. 

 प्रास्ताविक भाषणात आमदार प्रा राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी हे सर्वप्रथम प्रकाशझोतात आणण्याचे काम भाजपा शिवसेना युती सरकारनेच केले आहे. तत्कालिन मंत्री अण्णासाहेब डांगें यांनी अडगळीत पडलेल्या या जन्मभूमीत अनेक विकास कामांच्या माध्यमातून कायापालट केला. त्यामुळे आज चोंडीचे चित्र बदलताना दिसत आहे.

हाळगाव येथे ६५ कोटी रूपये खर्चुन सरकारी कृषी महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सूरू केले. सोलापुर विद्यापीठाचे नामांतर देवेंद्र फडणवीस यांनी यांनी करून अहिल्यादेवी होळकरांचे नाव दिले. त्याचबरोबर अहिल्यादेवी जयंती शासनाच्या वतीने साजरी करण्यासाठी निर्णय घेतला.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, सत्तेचा माज असणारे लबाड लांडग्यांचे सरकार हाकलून लावले आहे. चौंडीत होणारा कार्यक्रमातील सन्मान व अपमान समाज लक्षात ठेवतो. अनेक सरकार आले आणि गेले. मागील सरकारला याची जाणीव नव्हती. मागच्या सरकारने मागच्या वर्षी अहिल्या भक्तांचा अवमान केला, त्यामुळे त्यांचे सरकार गेले, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान सामाजिक कार्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यातील  प्रत्येकी एका महिलेस  मुख्यमंत्री शिंदे  व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा दृकश्राव्य संदेश प्रसारित करण्यात आला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आभार मानले. 

चौकट – १ 

पुढल्यावर्षी जयंतीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी.

———————————————

आपल्या भाषणात आमदार प्रा राम शिंदे यांनी  चोंडी येथे देशाचे राष्टपती ,लोकसभा सभापती, अनेक केंद्रियमंत्री आणि अनेक मुख्यमंत्री येथे आले आहेत.मात्र फक्त प्रधानमंत्री चोंडीला आलेले नाहीत. त्यामुळे पुढल्यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना चोंडीत आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

चौकट – २

आमदार प्रा राम शिंदे यांनी अहिल्यादेवी नगर नामकरणाचा निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्षात घोषणा केल्यावर अहिल्या भक्तांनी फेटे व रुमाल उडवत व पिवळे झेंडे फडकावत अहिल्यादेवींच्या जयजयकार घोषणा देत जल्लोष केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here