ओबीसी, व्हीजे-एनटी जनमोर्चाच्यावतीने अभिवादन
नगर – सर्वसामान्यांचे नेतृत्व गोपीनाथ मुंडे यांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देतांनाच आपल्या तत्वाशी, पक्षाशी एकनिष्ठ राहणारा हा लोकनेता होता. या नेत्याची विविध राजकीय पक्षातही मित्र परिवार होता. विरोधकांच्या मनातही त्यांनी आदराचे स्थान मिळविले. या नेत्याला विसरणे शक्य नाही. इतिहासात गोपीनाथ मुंडे यांचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल, असे गौरवोद्गार ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे यांनी काढले. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.भिंगारे बोलत होते. अध्यक्षस्थानी जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.
ऊसतोड कामगार ,ओबीसीसह वंचित समाजाचे प्रश्न त्यांनी मांडून राज्यात वंचित समाजाचे संघटन तर केलेच पण, पक्षालाही राज्यात सत्तेवर आणण्यापर्यंतची किमया प्रमोद महाजन यांच्याबरोबर निष्ठेने राहून केली. त्यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात श्री.भुजबळ यांनी केले.
डॉ.सुदर्शन गोरे यांनी आपल्या भाषणात स्व.मुंडे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी यांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला. सत्तेत आल्यावर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही समाजाबद्दल आकस न दाखवता ज्यांना गरज आहे, त्यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे होते. ते संघाच्या मुशीतून तयार झालेले देशभक्त आणि धर्मभक्त होते, पण सर्व धर्मसमभावाला त्यांनी प्राधान्य दिले, असे भगवान बाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी सांगितले.
प्रारंभी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला जनमोर्चाचे शहरजिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय आव्हाड, साईराज गोल्ड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पडोळे, जनमोर्चाचे सचिव विनोद पुंड , जागरूक नागरिक कृती समितीचे निमंत्रक कैलास दळवी , जनमोर्चाचे सरचिटणीस संजय सागावकर, महिला तालुका अध्यक्षा सौ.रुपाली पुंड आदिंची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुदर्शन गोरे यांनी केले तर शेवटी रमेश सानप यांनी आभार मानले.