उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) : पर्यावरणाचे, निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणाऱ्या ‘बहराई फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील ‘श्री एकवीरा देवी मंदिर, वेश्वी’ येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. काही दिवसांपूर्वी तिथे पक्षी निरिक्षणासाठी गेलेल्या बहराईच्या सदस्यांनी तिथला कचरा पाहिला. मंदिराच्या सभोवताली प्लास्टिक सोबत दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः विळखा होता. त्याचवेळी तिथे स्वच्छता करण्याची गरज असल्याचं लक्षात आलं. या ठिकाणी अगदी पायथ्या पासून ते वर मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून पुढे रानात घेऊन जाणाऱ्या तिथल्या दोन पायवाटा, हा संपूर्ण परिसर पक्षी निरिक्षणासाठी उत्तम आणि नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध असा आहे. त्यामुळे अशा ठिकाणी स्वच्छता व शांतता टिकून ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे, अशी भावना बहराईच्या सदस्यांनी व्यक्त केली.
सकाळी ७ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत म्हणजे साधारण पाच तास चाललेल्या स्वच्छते दरम्यान, तिथून जमा केलेल्या कचऱ्यात प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्यांच प्रमाण खूप अधिक होतं. हे विदारक चित्र समाजाची बिघडलेली मानसिकता दर्शविणारे आहे. त्यामुळे अशा उपक्रमातून समाजाची जनजागृती करणे खूपच गरजेचे आहे. श्री एकविरा मंदिर वेश्वि किंवा अशा कोणत्याही ठिकाणी आनंद अनुभवण्यासाठी जाताना आपलं निसर्गभान जागृत ठेवून, तिथल्या नैसर्गिक सौंदर्याला आपल्याकडून कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे, हाच संदेश ‘बहराई फाउंडेशन’ने आपल्या कृतीतून समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे . यावेळी श्रमदान करण्यासाठी बहाराई फाउंडेशनचे सदस्य, अंकिता ठाकूर, रामनाथ पाटील, महेश पालकर, विशाल ठाकूर, दौलत पाटील, तुषार पाटील यांच्यासोबत बहराई फाउंडेशनचे कोषाध्यक्ष सुरेंद्र पाटील व सचिव वैभव पाटील हे सहभागी होते.
माणूस श्रद्धेनं आपल्या मनःशांतीसाठी किंवा निवांतपणासाठी अशा पवित्र ठिकाणी गेल्यावर तिथे कचरा करून परतणार असेल तर अशा समाजाला प्रबोधनसोबतच आत्मपरीक्षणाची देखील नितांत गरज आहे. – वैभव पाटील सचिव, बहराई फाउंडेशन