विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेले 76 लाख मतदानाचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत
येवला प्रतिनिधी
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाहीत शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मतदार यादी मध्ये घोळ करण्यात आला या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली ? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे, यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवलेले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती त्यामुळे मतदार यादीतील घोळ रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.
राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास राहिलेला नाही आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे, जनतेची भावना महत्त्वाची आहे. आज दिनांक 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाच्या औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाचा पक्षपाती कारभारांचा पडदा पाश करीत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासारखा अबाधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, प्रीतम पटणी, तालुका कार्याध्यक्ष सुखदेव मढवई, नानासाहेब शिंदे, शहराध्यक्ष मंगल परदेशी, युवक शहराध्यक्ष अक्षय शिंदे, बाबासाहेब शिंदे, मुसा शेख, राजेंद्र पगारे आधी सह पदाधिकारी उपस्थित होते