दिवाळीनिमित्त ऊस उत्पादक व कामगारांसाठी थोरात कारखान्याकडून २६ कोटी – माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

0

संगमनेर : अत्यंत काटकसर आणि  पारदर्शकतेतून संगमनेरच्या सहकाराची लौकिकास्पद यशस्वी वाटचाल सुरू आहे. मागील वर्षी १५ लाख ५३ हजार मे. टनाचे विक्रमी गाळप करताना कारखान्याने कर्जफेडी बरोबर ऊस उत्पादकांना चांगला भाव दिला आहे. दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांसाठी १७६ रुपये ऊस प्रोत्साहन पर अनुदान देण्याबरोबर या दिवाळीसाठी  ऊस उत्पादक व कामगारांसाठी एकूण २६ कोटी रुपये देणार  असल्याची घोषणा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा राज्याचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केली.
           सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५६ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर आ.डॉ सुधीर तांबे, बाजीराव पा खेमनर ,सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे ,रणजीतसिंह देशमुख, ॲड. माधवराव कानवडे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात,डॉ हसमुख जैन ,संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, व्हाईस चेअरमन संतोष हासे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलताना आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर कारखान्याचा कारभार सुरू आहे.अत्यंत जितासूपणे व काटकसरीने तसेच कुटुंबाप्रमाणे या कारखान्याचा कारभार चालतो आहे. त्यामुळे देशपातळीवर कारखान्याचा वेळोवेळी गौरव झाला आहे. मागील वर्षी कारखान्याने १५ लाख ५३ हजार मॅट्रिक टनाचे  विक्रमी गाळप केले आहे. यावर्षी दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना १७६ रुपये प्रति टन याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यामुळे २६२६ रुपये भाव प्रति टन मिळणार आहे. हे अतिरिक्त अनुदान १४ कोटी रुपये ठेवींवरील व्याज २ कोटी रुपये आणि कारखान्याच्या कामगारांचा बोनस १० कोटी रुपये असे एकूण २६ कोटी रुपये कारखान्याचे वतीने देण्यात येणार आहे.निळवंडे कालव्यांच्या कामाला आपण कायम गती दिली. या दिवाळीच्या पाडव्याला पाणी कालव्यांद्वारे आणायचे आपले स्वप्न होते.परंतु सरकार बदलामुळे गती मंदावली आहे. मात्र आता हे पाणी कोणीही थांबू शकणार नाही. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून सरकारने घोषणे ऐवजी थेट शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवावी. तसेच ऊसाचे एकरी उत्पादन वाढवावे असे आवाहनही त्यांनी केले
            चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याला देश पातळीवर सन्मान मिळाला आहे. हे सर्व टीमचे यश आहेे.  कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. सहकार क्षेत्रातून महाराष्ट्रात मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पुन्हा विक्रमी गाळप होईल असेही ते म्हणाले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, १५ लाख ५३ हजार मेट्रिक टनाचे गाळपाबरोबर ६५ कोटींची वीज विक्री कारखान्याने केली असून पन्नास लाख लिटरचे इथेनॉल उत्पादन केले आहे.  हवामानामुळे काही भागांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यावर प्रतिबंध करण्यासाठी कारखान्याच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.याप्रसंगी विष्णुपंत रहाटळ, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सो सौ.अर्चनाताई बालोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ ,सौ प्रमिलाताई अभंग, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, राजेंद्र चकोर, विलास वर्पे, आर.बी. राहणे, शांताराम कढणे, संचालक गणपतराव सांगळे, चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, अभिजीत ढोले, भास्करराव आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ तुषार दिघे, दादासाहेब कुटे ,विनोद हासे, अनिल काळे, माणिकराव यादव, सुधाकरराव रोहम, श्रीमती मीराताई वपेॅ ,रामदास पा. वाघ, संभाजी वाकचौरे , किरण कानवडे , भास्कर पानसरे आदी उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी  तर कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष  हासे यांनी आभार मानले.

चौकट :- राजहंस दूध संघाकडून प्रतिलिटर एक रुपया रिबेट जाहीर
ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करणा-या राजहंस दूध संघाने कोरोनाच्या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. दूध संघाकडून सर्वाधिक ३५ रुपये लिटर भाव दिला जात असून १६ ऑक्टोबर २०२२ पासून प्रतिलिटर ३६ रुपये प्रति लिटर दर देण्यात येणार  आहे. या दिवाळीनिमित्त प्रति लिटर एक रुुपया प्रमाणे रिबेट देण्यात येणार असल्याची घोषणा आ. थोरात यांनी केली.

चौकट :-सहकारातील विविध संस्थांचा देश पातळीवर गौरव
संगमनेरचा सहकार हा देशासाठी आदर्शवत असून मागील दोन महिन्यात थोरात सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय गुणवत्तेचा पुरस्कार ,बाजार समितीला नाशिक विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, संगमनेर नगरपालिकेला देशपातळीवरील स्वच्छतेचा दहा कोटींचा पुरस्कार, अमृतवाहिनी एमबीएला राज्यातील बेस्ट कॉलेज पुरस्कार, कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना उत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कार अशा विविध पुरस्कारार्थींचा सन्मान आ. थोरात यांनी केला. हा तालुक्याचा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here