कोल्हापूर
सद्विचारी, सुसंस्कारित समाजनिर्मितीसाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या देशभरातील साधुसंतांचा सहवास कणेरी मठावर येणाऱ्या भक्तांना लाभणार आहे. महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह देशभरातील सुप्रसिद्ध संतमहात्म्ये २३ फेब्रुवारी रोजी आपल्या अमृत वाणीने नव्या जीवनशैलीची महती सांगणार आहेत.
भारतीय संस्कृती, अध्यात्मिक विचारांचा वारसा जपणारा मठ म्हणून कणेरी मठ अर्थात श्री क्षेत्र सिध्दगिरी महासंस्थान प्रसिध्द आहे. विज्ञान, समाजसेवा, समाजकल्याण, संशोधन, प्रयोग आणि चवळवळ अशा अनेक माध्यमातून चालविले जाणारे हे संस्कार केंद्र आहे. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घातल्यास जीवनाची वाटचाल सुखी आणि प्रगतीच्या दिशेने होऊ शकते, हे सांगणारे या चळवळीतील एक नाव म्हणजे श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी. त्यांच्याच संकल्पनेतून सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात देशभरातील साधुसंतांना एकत्रित आणण्यात येत आहे. या संतांचे त्या त्या प्रांतातील काम कौतुकास्पद आहे. केवळ आध्यात्मच नव्हे तर भारतीय संस्कृती, गुरूकुल, शिक्षण, आरोग्य, संशोधन अशा अनेक क्षेत्रात या संतांचे आजही अहोरात्र कार्य सुरू आहे. त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, त्याची प्रेरणा मिळावी, त्यांचे मार्गदर्शन व्हावे, नव्या जीवनशैलीचा साक्षात्कार व्हावा यासाठी २३ फेब्रुवारी रोजी साधुसंतांचे हे संमेलन होणार आहे.
यामध्ये वृक्षारोपणाचा आदर्श निर्माण करणारे पद्मश्री, महाराष्ट्र भुषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, स्वामी त्यागवल्लभदासजी, माधवप्रिय दासजी, त्रिकमदाजी स्वामी, संपूर्णानंदजी, जगद्गुरु सुत्तुर शिवरात्रीश्र्वर स्वामीजी, डॉ भाई मनजीत सिंगजी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांचे अलौकिक मार्गदर्शन भक्तांना मिळणार आहे.