जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन, प्रशासन व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नाने भंडारा जिल्हा विकास पथावर अग्रेसर ठेवण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योगमंत्री तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज केले.
.
पोलिस कवायत मैदानावर आयोजित महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिवस समारंभात ते जिल्हावासीयांना संबोधित करत होते. सकाळी 8 वाजता पालकमंत्री सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीतानंतर पोलिस, गृहरक्षक दल यांची संयुक्त मानवंदना व संचलन यावेळी झाले.
यावेळी जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्र्यांनी भाषणात घेतला.त्यामध्ये भंडारा जिल्हा यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा शिक्षकांची 100% नोंदणीबाबत राज्यात प्रथम स्थानी असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या संदेशवहनासाठी प्रभावी चॅटबोट करीता प्रशासनाला व ज्योती नागलवाडे या सहशिक्षीकेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला असून ही जिल्ह्याच्या साठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा या अभियानामध्ये जिल्ह्याने उत्तम काम केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावर यशस्वी ठरलेल्या 48 शाळांना एक कोटी 22 लक्ष रुपये रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पासाठी मंत्रिमंडळाने 25 हजार 972 कोटी 69 लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पाला गती मिळेल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी वेगाने सुरू असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी जोडणीमध्ये भंडारा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी पंपांचे उर्जीकरण योजनेत 2024 -25 मध्ये 576 कृषी पंप ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आले असून मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत 1620 लाभार्थी पात्र झाल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणतर्फे वीज गळती कमी करण्यासाठी तसेच स्मार्ट मीटरिंगसाठीच्या योजना सुरू आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर ऊर्जा योजनेत सहभागी होऊन लोकांनी हरित ऊर्जा निर्माण करून पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे,असे ही आवाहन त्यांनी केले. या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 2767 वीज ग्राहकांच्या छतावर सौर प्रकल्प उभारण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा जिल्ह्यात पारंपारिक रित्या टसर कोश उत्पादन घेतले जात असून कोश उत्पादन ते कापड निर्मिती करणारा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी पुढाकार घ्यावा ,असे आवाहन त्यांनी केले.
यांचा झाला सन्मान….
ज्योती नागलवडे जि.प. जिजामाता प्राथमिक शाळा तूमसर जि. भंडारा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2024-25 या अंतर्गत राज्य सर्वोत्कृष्ट कल्पना/ उपक्रम शासकीय कर्मचारी हा व्दितीय पुरस्कार प्राप्त झाल्याबददल सन्मानित करण्यात आले. चॅटबोट या प्रभावी संदेश वहन प्रणाली साठी अभिषेक नामदास,अवयव दानासाठी मालती सिंगनजुडे,नेत्रदानासाठी राजु नगारशी मस्के,कुशल सवाने,रसीकलाल ठकराल,रणवीर बांते,दिपेन धंधुकीया यांना सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट अग्निशमनाचा कार्य करण्यासाठी समीर गणवीर,हमीद खॉ पठाण,उत्कृष्ठ तलाठी म्हणून कु.पी.के सांगोळकर,गृह विभागाच्या वतीने प्रभारी पोलिस अधिक्षक गृह उल्हास भुसारी,कोमलचंद वाढई ,श्यामु वाढई,अरूण वाघाये ,नितीन शिवणकर, दिपक बुलबुले ,रामभाऊ बागडे
आयुध निर्माणी स्फोटादरम्यान उत्तम कार्य करणाऱ्या पोलिस निरीक्षक दादाराव दाते,पोलिस उपनिरीक्षक सुनील कराळे,पोलिस उपनिरीक्षक सारंग गुडधे,यांनाही पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.वन विभागाच्या शीघ्र बचाव दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .त्यामध्ये अनिल शेळके,सचिन कुकडे,अजय उपाध्याय,निलेश श्रीरामे,नितीन उशीर, विजय राऊत,अमोल चौबे,सतिश शेंद्रे,मेघराज तुलावी, विठ्ठल हटवार,अनिल झंजाड,बालाजी कदम,डेव्हीडकुमार मेश्राम यांचा ही सत्कार करण्यात आला.