कळमनुरी उपविभागातील सर्व गावातील शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी गुरुवारी ता. 1 केले आहे.
.
कळमनुरी उपविभागातील आखाडा बाळापूर येथे आयोजित विशेष शिबिराला उपविभागीय अधिकारी भुते यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी तहसीलदार जिवककुमार कांबळे, मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे ग्राम महसूल अधिकारी विशाल पतंगे, गोविंद बोरगे, ग्रामविकास अधिकारी रुद्राजी क्षीरसागर, संगणक ऑपरेटर रिंगे, शेख अनवर, पप्पू गृहपाल उपस्थित होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी भुते यांनी शिबिरामध्ये केल्या जात असलेल्या कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांना विनाकारण रांगेत उभे करू नये, ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची तातडीने नोंदणी करून घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
कळमनुरी उपविभागातील सर्व गावातील शेतकऱ्यांनी ता. 5 मे पर्यंत शेतकरी ओळखपत्र साठी नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठीच ग्रामपंचायत पातळीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिरांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे.
शेतकरी ओळखपत्र असल्याशिवाय शासनाच्या कृषीविषयक योजनांचा लाभ घेता येणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे. कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम शेतकरी ओळखपत्र तपासले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते