शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मध्यस्थीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावरून शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘बे लाज, बे शरम’ म्हणत संजय राऊत यांच्याव
.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 7 मे रोजीच्या रात्री ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानकडून भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले. भारताने हे हल्ले हाणून पाडले. सुमारे तीन दिवस दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी केली. यावरून ट्रम्प यांना मध्यस्थीचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला होता. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत राऊतांवर निशाणा साधला आहे.
नेमके काय म्हणाले गुलाबराव पाटील?
बेलाज, बेशरम जो माणूस असतो ना…तो या प्रकारच्या गोष्टी करत असतो. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर विचारणारे तुम्ही कोण आले. तुम्ही तुमची मध्यस्थी मातोश्रीवर करा. इकडे मध्यस्थी करू नका, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
आपण कोण बोलत आहोत. कोणावर बोलत आहोत. तुम्ही साधे नगरसेवक तरी झाला आहात का? आमदारांच्या मतावर तुम्ही खासदार झालात आहात. आज काय परिस्थिती आहे. देशाच्या बाजूने उभे राहण्याची आज वेळ आहे. परंतु आपल्याच घरातील लोक पंतप्रधान यांच्यावर टीका करत असतील तर देशाची परिस्थिती काय होईल?.त्याचा विचार राऊत यांनी करावा, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिला.
दोन्ही पवार एकत्र आल्यास आश्चार्य वाटू नये
सध्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत गुलाबराव पाटलांना विचारले असता, राजकारणात काही होऊ शकते. निवडणुका आटोपल्या की लोक दहा दिवसांत पक्षांतर करत आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर आश्चार्य वाटू नये, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.