सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधण्यात येत असलेल्या येथील बस स्टँड ते जयस्तंभ चौक रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण असल्यामुळे हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
.
हा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असून, परतवाडा, मोर्शी, ब्राह्मणवाडा थडी या मोठ्या गावात जाण्यासाठी हाच मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या रस्त्याला लागून चांदूर बाजार ची संपूर्ण बाजारपेठ आहे. त्यामुळे या बाजारपेठेमध्ये जाण्यासाठी लांबून फिरून जावे लागत आहे. बस स्टॅन्ड ते जयस्तंभ चौक पर्यंतच्या या मुख्य रस्त्याच्या कांक्रीटीकरणाची सुरुवात दिवाळीपूर्वी झाली आहे. मात्र दुहेरी असणाऱ्या या रस्त्याचे बांधकाम एका बाजूनेच करण्यात आले आहे. यामुळे हा रस्ता एका बाजूने उंच झाला असून दुसऱ्या बाजूने या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहे. स्टेट बँकेकडून येणारे वाहन, या रस्त्यावर येतात. येथे चौफुली असल्याने, नवीन वाहन चालकाला हा रस्ता एकेरी झाला असल्याचे माहित होत नाही. शिवाय पुढे असे कोणतेही दिशादर्शक नसल्याने असे वाहन स्टेट बँकेकडून येणाऱ्या, या रस्त्यावरून सरळ पुढे नेले जाते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. या विचित्र स्थितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेले रस्ते हे नागरिकांच्या जीवावर तर उठले नाही ना, असाही प्रश्न या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांच्या चर्चेमधून व्यक्त होत आहे.
मुख्य रस्त्याच्या अपूर्ण बांधकामामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे होणाऱ्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागात जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष टिकू उर्फ आनंद अहिर यांनी व्यक्त केली. तर दिवाळी पूर्वीपासून सुरू झालेल्या या रस्त्याचे बांधकाम काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने याचा त्रास बाजारात येणाऱ्या नागरिकांना होत असून त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत असल्याची प्रतिक्रिया विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली.