समाजात सभोवताली कौटुंबिक हिंसाचार, पहेलगामसारखे दहशतवादी हल्ले अशा सांस्कृतिक ऱ्हासाच्या घडामोडी घडत असताना केवळ शब्दांचे फुलोरे फुलवणारे लेखन पुरेसे ठरणारे नसून बालवयातच संवेदनशील मने घडतील, असे बालसाहित्य आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आण
.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे २०२४ या वर्षातील बाल वाङ्मय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.न.म. जोशी बोलत होते.
महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारुहास पंडित, ज्येष्ठ लेखिका आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या विश्वस्त डॉ मंदा खांडगे, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सल्लागार डॉ. संगीता बर्वे, अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त शिरीष चिटणीस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध वर्गवारीत बालसाहित्यिकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. न.म. जोशी म्हणाले की, इतरांपेक्षा आपले साहित्य वेगळे ठरेल, वेगळा ठसा उमटवेल या दृष्टीने लेखकांनी साहित्य निर्मिती करावी. आपले लेखन हे ‘फोकल पॉईंट’ लक्षात ठेवून उतरणे आवश्यक आहे.
यावेळी बोलताना चारुहास पंडित म्हणाले की, आजचे पुरस्कारार्थी लेखक हे भविष्यातील पिढी घडविण्याचे राष्ट्र कार्य करीत आहेत. मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचे अतिक्रमण होत असताना देखील ते निष्ठेने आणि पाय रोवून साहित्य निर्मिती करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे. शहरांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मराठी शाळा मराठी भाषेच्या अनुषंगाने अनेक स्तुत्य प्रयोगशील उपक्रम राबवित आहेत. या या उपक्रमशीतेच्या माध्यमातून एक प्रकारे राष्ट्राची पायाभरणीच केली जात आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. आजची बालपिढी त्यांना उपलब्ध असलेल्या तांत्रिक साधनांमुळे अधिक स्मार्ट झाली असून, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे आवश्यक आहे.