धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव मंगळवार दि.२५ ते शनिवार २९ मार्च या कालावधीत साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची महिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून दिल्ली व अजमेर येथील आकर्षक रहाट पाळणे, खेळणी, विविध वस्तू व खाऊ गल्ली हे यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे. यात्रा उत्सवानिमित्ताने २५ मार्च रोजी सकाळी १० ते १२ समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. सायंकाळी ५ वाजता गंगाजल आणण्यासाठी भाविकांचे पुणतांबाकडे प्रयाण होईल. २६ मार्च रोजी सायंकाळी ८ ते ११ वाजता मुंबई येथील स्वररंग ‘रंग महाराष्ट्राचा’ हा मराठमोळ्या संस्कृतीचा रंगतदार आविष्कार कार्यक्रम होणार आहे.
२७ मार्च रोजी सकाळी ६ वाजता ढोललताशांच्या गजरात श्री क्षेत्र पुणतांबा येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाची शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.पालखीचे पूजन सायंकाळी ६:३० वाजता उद्धव महाराज मंडलिक यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी ७ ते ११ दरम्यान महाराजांचे वंशज संजय बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून श्रीराम मंदिर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काकासाहेब चौक ते श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर या मार्गावरून पालखी मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. या मिरवणुकीत राज्यातील नामांकित बॅण्ड पथक सहभागी होऊन जुगलबंदी रंगणार आहे.
रात्री १०:३० वाजता यात्रा कमिटीच्यावतीने शोभेच्या दारुची डिजिटल आतिषबाजी होईल. २८ मार्च रोजी दुपारी ४:३० वाजता कुस्त्यांचा हंगामा असून यात मानाचा समर्थ केसरी किताब, चांदीची गदा हे प्रमुख बक्षीस ठेवण्यात आले आहे. २९ मार्च रोजी रात्री ८ वाजता ‘पाव्हणं तुम्ही म्हणाल तसं’हा बहारदार लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अर्चना जावळेकर, नमिता पाटील, संगिता लाखे, प्राची मुंबईकर, किरण पुणेकर, शुभांगी पुणेकर आदी नामांकित नृत्यतारका कला सादर करणार आहे.
यात्रेसाठी समाजातील विविध दानशूर मंडळी,संस्था, देवळाली प्रवरा नगरपरिषद, महसूल प्रशासन पोलीस, होमगार्ड , माजी सैनिक यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी यात्रेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वंशज संजय पाटील, कार्याध्यक्ष शुभम पाटील,नारायण उर्फ बापू कडू,गणेश भांड,तुळशीराम कडू,सतीश वांळुज,अनिल ढुस,धनंजय शिंदे,भारत शेटे, अनिल कडू,दत्तात्रय कडू,सुखदेव होले, बापू कडू, संदिप कडू, राजेंद्र पोकळे, मुस्ताक शेख, सचिन सरोदे, रंगनाथ होले,अशोक शिंदे,गजानन येवले आदिंसह सदस्यांनी केले आहे.