उजव्या कालव्याही लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी सोडणार -आ. आशुतोष काळे

0

कोळपेवाडी वार्ताहर :- सुरुवातीला पडलेल्या दमदार पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या होत्या.परंतु जवळपास एक महिन्यापासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला होता.त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून सोमवार (दि.१४) पासून गोदावरी डाव्या कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले असून उजव्या कालव्याला देखील लवकरच पाणी सोडणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

पावसाळा सुरु होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी अद्यापपर्यत कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे अजूनही भूजलपातळी वाढलेली नाही. मात्र मे महिन्यात पावसाने दिलेली जोरदार सलामी व सोबतीला भरपूर पर्जन्यमान होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज त्यामुळे पाऊस पडेलच या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, भुईमुग आदी खरीप पिकांच्या पेरण्या केल्या. मात्र मागील एक महिन्यापासून कोपरगाव मतदार संघातून पाऊसच गायब झाल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात येवून शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या.

दुसरीकडे धरण क्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे सर्वच धरणांचा पाणी साठा जवळपास ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचला असून नासिकच्या धरणातून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीमध्ये जायकवाडी धरणात जवळपास ३५ टीएमसी पाणी वाहून गेल्यामुळे आजमितीला जायकवाडी धरणाचा पाणी साठा ८० टक्क्याच्या वर जावून पोहोचला आहे. धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिल्यास जुलै महिन्याच्या अखेर पर्यंतच जायकवाडी धरण १०० टक्के भरले जाणार असून  अद्यापही ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे. याकडे आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधून त्यांच्यापुढे लाभ क्षेत्रातील परिस्थिती मांडून गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.कालव्यांना पाणी सोडल्यास भूजलपातळी वाढण्यास मदत होवून शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होईल. अडचणीच्या काळात हेच पाणी खरीप पिकांना देता येईल व शेतकऱ्यांना आपले खरीप पिक वाचविता येणार असल्याचे सांगितले होते.

त्या मागणीवरून सोमवार (दि.१४) पासून गोदावरी डाव्या कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे. लहरी पावसाचा भरवसा नाही. त्यामुळे अजून पाऊस किती दिवस वाट पहायला लावणार हे सांगता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त दिवस पाणी पुरेल एवढा पाणीसाठा पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावात होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व पाणी पुरवठा करणारे साठवण तलाव पूर्ण क्षमतेने काळजीने भरून घ्यावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले असून उजव्या कालव्याला व पालखेड डाव्या कालव्याला देखील पाणी सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगतले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here