अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारचा अट्टाहास कायम आहे. तसेच यासाठी कायदेशीर हालचाली करण्यासाठी देखील कर्नाटक सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आता थेट इशारा दिला आहे. जर कर्नाटक सरकार
.
कोल्हापूर येथे बोलत असताना प्रकाश आबिटकर म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र सरकारचा विरोध असल्याचे केंद्राकडे स्पष्टपणे सांगितले आहे. अलमट्टीमुळे सांगली आणि कोल्हापूरला सर्वाधिक फटका बसणार असल्याचे ते म्हणाले. धरणाची उंची वाढवण्यासाठी जर कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू असे ते म्हणाले. कायदेशीरदृष्ट्या जे जे करावे लागेल ते आम्ही करु.
पुढे बोलताना आबिटकर यांनी सांगितले की, दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुढील आठ दिवसात कृषी विभाग आणि महापूर नियंत्रणा संदर्भात देखील बैठका होतील. महापूर रोखण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या केल्या जातील. महापूर येऊ नये यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि सांगलीचे आम्ही पालकमंत्री समन्वय ठेऊन काम करत आहोत.
दरम्यान, अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व संबंधित राज्यांची 15 दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन केंद्र सरकारने कर्नाटकच्या शिष्टमंडळाला दिले आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांचा या धरणाची उंची वाढवण्याला विरोध आहे. त्यामुळे हा विषय वादाचा मुद्दा ठरत आहे. अलमट्टीची उंची वाढवण्याला कृष्णा पाणी वाटप लवादाने परवानगी दिली आहे. त्यामुळे धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटरपर्यंत वाढवण्याबाबतची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन केली आहे.