राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या भेटीमध्ये अजित पवार यांनी वैष्णवीच्या वडिलांशी जवळपास पाऊणतास चर्चा केली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे अजित पवारांनी सा
.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. सासरची मंडळी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करत होते, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांना अटक केली आहे. या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आज वैष्णवीच्या वडिलांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे सांगितले.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, ही घटना घडल्यानंतर मी पिंपरी चिंचवडचे सीपी चौबे म्हणून आहेत, त्यांना ताबडतोब सांगितलेले होते की, ही अतिशय चुकीची घटना आहे. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचीही हयगय करायची नाही, कोणाचाही राजकीय हस्तक्षेप असला तरी जुमानायचे नाही. या घटनेमध्ये त्या मुलीला त्यांनी ज्या पद्धतीने छळलेले आहे, या घटनेशी संबंधित जे जे लोक असतील त्यांना ताबडतोब पकडले गेले पाहिजे.
पुढे ते म्हणाले, या घटनेत पोलिसांनी वैष्णवीच्या सासूला, नणंदेला, वैष्णवीच्या पतीला आधीच पकडले होते, मात्र तिचा सासरा आणि दीर सापडत नव्हते, त्या संदर्भात मी सतत सीपींच्या संपर्कात होतो. माझ्या काही कार्यकर्त्यांनी अनिलराव कस्पटे यांच्या घरी येऊन त्यांच्याशी माझे संभाषण करून दिले, त्यावेळी मी बाहेर गावी होतो. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की मी संध्याकाळी कोल्हापूरहून येणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला भेटायला येतो. ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या गोष्टी मला मनमोकळेपणाने सांगा. येताना मी सीपींना पण सांगतो तिथे यायला.
अजित पवार म्हणाले, या प्रकरणात आणखी एक व्यक्ती समोर आली आहे, चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे, ज्या व्यक्तीने वैष्णवीच्या बाळाला आणताना काही चुकीच्या गोष्टी केल्या. वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला पकडल्यानंतर पोलिस तिचा सासरा आणि दीराच्या मागावर होते. ते सतत फोन बदलत होते, त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचण येत होती, मात्र पोलिसांनी सापळा रचला आणि त्यांना अटक केली.
हे प्रकरण आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहोत. या प्रकरणात चांगला सरकारी वकील देणार आहोत. या संदर्भात माझं वैष्णवीच्या वडिलांशी देखील बोलणे झाले आहे, त्यांनी देखील एक-दोन नावे सांगितली आहेत, त्यावर विचार सुरू आहे, आरोपींना कडक शिक्षा दिली जाईल, या संदर्भात माझे मुख्यमंत्र्यांशी देखील बोलणे सुरू आहे, असेही यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.