भाजपविरोधात एकत्र लढू,’ काँग्रेससह 17 पक्षांची पाटण्यात घोषणा

0

हनुमान आता आमच्या बरोबर

पाटणा : “आम्ही 2024 ची निवडणूक एकत्र लढू आणि भाजपला सत्तेतून बाहेर काढू. आम्ही यात यशस्वी होऊ,” असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पाटण्यात म्हणाले. बिहारची राजधानी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील भाजपविरोधक पक्षांची बैठक बोलावली होती.या बैठकीला काँग्रेस, आप, तृणमूल, शिवसेना, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, सपा, डाव्यांसह 17 पक्षांचे नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, एमके स्टॅलिन, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांमधील अनेक नेते उपस्थित होते.

या बैठकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हेही उपस्थित होते. लालू प्रसाद यादव म्हणाले की, “भाजपनं हनुमानाचं नाव घेऊन निवडणुका लढवल्या. निवडणुका आल्या की ‘जय हनुमान’ करतात. आता हनुमान आमच्यासोबत असतात.”

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “विरोधकांच्या बैठकीत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे नेते होते. सर्व नेते एकजुटीने निवडणुका लढवण्यासाठी एक सामायिक अजेंडा तयार करत आहेत. आम्ही 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात बैठक घेत आहोत. तारखेत पुढे-मागे होईल.”

“बिहारमध्ये काय करायचं, यूपीमध्ये काय करायचं, असं प्रत्येक राज्याची स्वतंत्र रणनीती तयार केली जाईल. 2024 ची लढाई एकजुटीने लढायची आहे. भाजपला सत्तेतून हाकलायचे आहे. यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ,” असंही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले

या बैठकीचं आयोजन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, “पुढे आणखी एक बैठक होणार आहे. पण या बैठकीत एकत्र लढण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं. आताचं केंद्र सरकार देशाच्या हिताचं काम करत नाहीत. त्यामुळे सगळेच चिंतेत आहेत.”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी अगदी छोटेखानी संबोधन केलं. ते म्हणाले की, “भारताच्या मुलभूत रचनेवर आक्रमण होतंय. संस्था मोडल्या जातायेत. आमच्यात काही मतभेद असतील. पण एकत्र काम करण्याचं आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या विचारधारेचं आम्ही रक्षण करू.”

यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “खूप चांगल्या प्रकारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं. पाटण्यातून जे सुरू होतं, त्याचं जनआंदोलन होतं. दिल्लीत बऱ्याच बैठकी झाल्या, त्यातून काही फार निष्पन्न झालं नाही. त्यामुळे म्हटलं पाटण्यातून सुरू करा.”

“आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. भाजपचं हुकूमशाही सरकार आहे. आम्ही निवडून आलेल्या सरकारसमोर राज्यपालांचं समांतर सरकार चालवलं जातंय. कुणी काही बोललं, तर त्याविरोधात ईडी लावली जाते. माध्यमांना गप्प केलं गेलंय,” असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, मिलिंद नार्वेकर संजय राऊतही उपस्थित होते.

बैठकीनतंरच्या एकत्रित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, “आम्ही वेगवेगळे पक्ष असल्यानं अर्थातच विचारधारा वेगळ्या आहेत. मात्र, देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी एकत्र आलोय.”

“देशावर आघात कोणी केला तर आम्ही पुढे येणार. देशात जे लोक हुकूमशाही आणतायेत, त्यांच्या विरोधात आम्ही लढू,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here