[ad_1]
संतांनी त्यावेळी लिहिलेले ग्रंथ सध्याच्या काळात सर्वांना कसे मार्गदर्शक आहेत, हे समजण्यासाठी या ग्रंथांचे आधुनिक पद्धतीने अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत साहित्य संकृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
.
संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सव जयंती महापर्वानिमित्त सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग व सामूहिक चिंतन महाप्रकल्पाच्या विद्यमाने डॉ. मोरे यांचे ‘एकविसाव्या शतकात श्री ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाची आवश्यकता आणि अभ्यासाची दिशा’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी अभ्यास वर्गाचे आचार्य प्रा. डॉ. अनिल सहस्रबुद्धे, संयोजक डॉ. दिलीप धनेश्वर आदींसह अभ्यासवर्गाचे सर्व साधक उपस्थित होते. डॉ. सदानंद मोरे यांनी व्याख्यानातून ज्ञानेश्वरी ग्रंथ आजही सर्वांना कसा मार्गदर्शक आहे, याचे अनेक दाखले देताना मार्गदर्शन केले. मराठी बोलणाऱ्यांचा इतिहास लिहायचा असेल, तर ज्ञानेश्वरी हा पायाभूत ग्रंथ असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग व सामूहिक चिंतन महाप्रकल्पाचे काम खूप उत्कृष्ट असून, या यज्ञात मीही समिधा अर्पण करीत असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे म्हणाले, की ज्ञानेश्वरी अभ्यासवर्गात सहभागी साधक गेल्या दोन वर्षांपासून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामूहिक चिंतन व अध्ययन करत आहेत. सर्व साधक ज्ञानेश्वरीचा सर्वांगीण अभ्यास करून एका मोठ्या खंडात्मक बृहद्ग्रंथाची निर्मिती करीत आहेत. एवढा मोठा बृहद्ग्रंथ डॉ. सदानंद मोरे यांच्या दप्तरी ठेवायचा असल्याने त्यांना खास आग्रहाने पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन घेतले आहे. या महाप्रकल्पाला देवगड देवस्थान, अगस्ती देवस्थान, ज्ञानेश्वर देवस्थान, गीता मंडळ, सनातन धर्म सभा अशा अनेक संस्था जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वाथाने ज्ञानेश्वरीचा बृहद्ग्रंथ हा परिपूर्ण होणार आहे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजू रिक्कल यांनी केले. अभ्यासवर्गाचे संयोजक डॉ. दिलीप धनेश्वर यांनी आभार मानले. आजच्या आधुनिक २१ व्या शतकातही ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महत्त्व थोडेही कमी झालेले नाहीते. तो विश्वात्मक ग्रंथ आहे. श्रीमद्भागवत गीतेचा पहिला भाष्य ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी असल्याचा अभिमान सर्व मराठी जनांनी बाळगावा. संत ज्ञानेश्वर माऊली किंवा संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले ग्रंथ त्या काळच्या नागरिकांना अनुसरून व गृहीत धरून लिहिले होते. हे ग्रंथ आजही अभिजात आहेत, पण आता खूप वेगाने वैज्ञानिक बदल होत आहेत. त्यामुळे लोकांच्या ज्ञानाचा स्तर, भाषा बदलत असून, वैज्ञानिक दृष्टीकोन वाढत आहे. त्यामुळे या ग्रंथाची निरूपणाची व अर्थ लावण्याची पद्धतही बदलली पाहिजे.
[ad_2]