जामखेड तालुका प्रतिनिधी
वारकरी परंपरेच्या महत्वपूर्ण पैठण-पंढरपूर पालखी मार्गावर सात वर्षांहून अधिक काळ काम पूर्ण न झाल्यामुळे या वर्षी पुन्हा वारकऱ्यांना कष्टकरी प्रवास करावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित असलेल्या या मार्गाचे काही भाग अजूनही अपूर्ण असून, कामाचा दर्जा खूपच निकृष्ट आहे. यामुळे वारकरी भक्तांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, तर राष्ट्रवादी शदरचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर व त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि वारकरी या स्थितीबाबत सरकारचे लक्ष वेधले आहे.
पैठणपासून पंढरपूरपर्यंतचा हा महामार्ग जवळपास आठ वर्षांपासून पूर्ण व्हायचा होता, मात्र अनेक ठिकाणी काम अपूर्ण राहिले आहे. ठेकेदारांनी रस्त्याचा दर्जा नीट न ठेवता आणि मानमानी करत निकृष्ट दर्जाचे काम अपेक्षित मानकांपेक्षा कमी केले आहे. अनेक ठिकाणी सिमेंट रोडचा अपूर्ण आणि कच्चा भाग असून, त्यामध्ये किमान सुरक्षा स्टीलचा वापरही केला गेला नाही. त्यामुळे रस्त्याला तडे पडल्या असून अनेक ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास खडतर झाला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, ग्राम.सदस्य प्रकाश गोलेकर, रामहरी गोपाळघरे, हरिभाऊ गोलेकर, मदन पाटील, महादेव धोत्रे, गोकुळ गोलेकर, राजेंद्र चव्हाण, मुकूंद गोलेकर, वैभव जमकावळे, गणेश ढगे या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या अपूर्ण आणि निकृष्ट कामाचा निषेध करण्यासाठी दिंडीतील भजनांमध्ये सामील झाले व वारकऱ्यांशी संवाद साधून सरकारकडे या समस्येचा तातडीने वेध घेण्याचे आवाहन केले. वारकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, पण ठेकेदार व संबंधित यंत्रणांनी योग्य कारवाई न करता कामात सुधारणा केली नाही. तसेच पाळखी मार्गाचा हा राष्ट्रीय महामार्ग सहसा पैठण, मुंगी, बोधेगाव, घोणसपारगाव, उखंडाचकला, बीड, सांगवी, शिरूर कासार, पंढरपूर असे अनेक गावं जोडतो. या मार्गावर अपूर्ण कामामुळे वारकऱ्यांना प्रवासादरम्यान मोठा त्रास होत आहे, आणि महामार्गाच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे आणि प्रशासनाकडे वारंवार मागणी होत असतानाही परिणामकारक उपाय योजना झाली नाही.