![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/Screenshot_2022-10-29-12-22-10-86_7352322957d4404136654ef4adb64504.jpg)
![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/Screenshot_2022-10-29-12-22-36-69_7352322957d4404136654ef4adb64504.jpg)
उरण दि. 29(विठ्ठल ममताबादे) रायगड जिल्ह्यातील उरण तालुका औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा तालुका समाजला जातो. अनेक विविध प्रकारचे विकासकामे येथे जोरात चालू आहेत.विकासाची कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र हा विकास नागरिकांच्या विकासाला अडथळा आणत असल्याचे चित्र दिसत आहे.उरण पनवेल मुख्य रस्त्यावरील फुंडे येथील सिडको कार्यालय जवळ असलेला पूल धोकादायक स्थितीत आहे. पूल कधीही पडू शकतो म्हणून या मार्गावर म्हणजेच उरण पनवेल मुख्य रस्त्यावर फुंडे हायस्कूल, बोकडविरा, कोटगाव येथे बॅरिकेट्स चॅनेल (लोखंडी कमान) लावून अवजड वाहनांना बंदी आणली गेली आहे. कोणत्याही अवजड वाहनांना आता या रस्त्यावरून प्रवास करता येणार नाही. मात्र सिडको प्रशासनाच्या सदर ठिकाणी लोखंडी कमान (बॅरिकेट्स चॅनेल) लावण्याचा निर्णयावर बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील नागरिक नाराज असून सदर बॅरिकेट्स चॅनेल काढले नाही तर सदर गावच्या ग्रामस्थांसह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या अन्याया विरोधात आंदोलन करणार आहेत.3 वर्षे लोटले तरीही सदर मोडकळीस आलेल्या पुलाचे काम अजूनही सुरु होत नसल्याने व सिडको प्रशासनाला, सिडकोच्या अधिकाऱ्यांना या समस्याकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याने जनतेतून याबद्दल आश्चर्य व्यक्ती केले जात आहे.उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनीही या बॅरिकेट्स विरोधात आवाज उठवत अगोदर सिडकोच्या पुलाची दुरुस्ती करावे व त्यानंतर बॅरिकेट्स त्वरित हटवावेत अशी मागणी केली आहे.उरण पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको कार्यालय उरण,तहसील कार्यालय उरण यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी पत्रव्यवहार करून ही मागणी केली आहे.
उरणमध्ये रेल्वे स्टेशन होत आहे. तसेच सिडकोने विकसित केलेले द्रोणागिरी नोड या परिसरात बाहेरून नागरिक मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी येत आहेत. सिडको प्रशासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने द्रोणागिरी नोड परिसरातील विकासासाठी व बिल्डर लॉबीला खुश करण्यासाठी बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी, पाणजे गावालगत अवजड वाहनांना प्रवेश बंदी म्हणून बॅरिकेट्स चॅनेल लावले आहेत. विशेष म्हणजे द्रोणगिरीतील बिल्डर लॉबी ने सिडकोला हाताशी धरून हे बरिकॅट चॅनल टाकलेले आहेत असा ग्रामस्थांचा आरोप आहे. मात्र हे बॅरिकेट्स चॅनेल लावल्याने जड वाहनासोबतच महामंडळच्या बसेस, मोठ्या खाजगी बसेस, शासकीय मोठे वाहने, ऍम्ब्युलन्ससह इतर वाहनांना येथून प्रवास करता येत नाही. महत्वाची वाहने सदर गावात पोहोचू शकत नाहीत. बोकडविरा, डोंगरी, फुंडे, पाणजे, कोटगाव या गावांना गावात घरे, बिल्डिंग बांधण्यासाठी खडी, माती, रेती, वीट, लोखंडी तारा-सळया लागतात. हे साहित्य अवजड वाहनातूनच सदर गावात न्यावी लागते. आता मात्र गावच्या वेशीवर, प्रवेशद्वारा जवळच प्रशासनाने बॅरिकेट्स चॅनेल बसविल्याने जड वाहनांना, मटेरियल नेणाऱ्या वाहनांना गावात जाता येत नाही.
बॅरिकेट्स चॅनेल मुळे गावातील महत्वाच्या वस्तू, सामान बाहेर नेता येत नाही. किंवा बाहेरून गावात मागविता येत नाही. सदर गावात बिल्डिंग मटेरियल किंवा अन्य महत्वाची वस्तू न्यायची असेल तर दुसऱ्या मार्गाने म्हणजेच भेंडखळ द्रोणागिरी नोड मार्गे जाऊन बोकडविरा, कोटगाव, फुंडे, पाणजे, डोंगरी गावात जावे लागत आहे. दुसऱ्या मार्गाने गावात वाहने दाखल होत असल्याने वाहन चालकांचा जास्त वेळ व श्रम खर्च होत आहे. शिवाय ज्यांच्या घराचे बांधकाम चालू आहे किंवा इमारतीचे बांधकाम चालू आहे त्यांना खडी, रेती, सिमेंट, लोखंडी तारा-सळया या मटेरियलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे. गावांच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ तसेच उरण-पनवेल मुख्य रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेट्स चॅनेल मुळे बोकडविरा, कोटगाव, फुंडे, डोंगरी या गावांचा विकास खुंटणार आहे. गावाच्या विकासाला खिळ बसणार आहे. शिवाय अवजड वाहनासाठी लावलेल्या या बॅरिकेट्स चॅनेलमुळे अनेक अपघात होत आहेत.आजपर्यंत या लोखंडी कमान(बॅरिकेट्स )मुळे 9 हुन अधिक अपघात झाले आहेत. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही.अनेक मोठे मोठे दुर्घटना होता होताना टळलेले आहे. एखादी मोठी दुर्घटना होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल सदर गावातील ग्रामस्थांनी व शेकाप तालुका चिटणीस विकास नाईक यांनी उपस्थित केला आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे सदर गावात कुठे अचानक आग लागली तर अग्निशमन दलाचे वाहन बॅरिकेडट्स चॅनेल मुळे त्या आग लागलेल्या ठिकाणी जाऊ शकत नाही. या अशा घटनेमुळे जीवितहानी होऊ शकते. त्यासाठी यावर अगोदरच उपाययोजना करायला हवा. त्यामुळे सदर बॅरिकेट्स चॅनेल 15 दिवसाच्या आत त्वरित हटवावीत अन्यथा शेतकरी कामगार पक्षातर्फे तसेच बोकडवीरा, कोटनाका, फुंडे, डोंगरी, पाणजे गावातील ग्रामस्थांतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका चिटणीस विकास नाईक यांनी प्रशासनाला दिला आहे.