खर्डा किल्ल्यासमोर स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने झाले महाराष्ट्रातील सर्वात उंच रावणाच्या प्रतीकृतिचे दहन

0

जामखेड तालुका प्रतिनिधी  – जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असलेल्या शिवपट्टन किल्ल्यासमोर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वात उंच म्हणजेच ७५ फुटी रावणाच्या प्रतीकृतीचे दहन स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने खर्डा किल्ल्यासमोर केले. या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींसह  हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

खर्डा किल्ल्यासमोर आयोजित केलेल्या या रावण दहन सोहळ्यासाठी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, रामायण या प्रसिध्द पौराणिक मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव हे देखील उपस्थित होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी धनुष्यबाण सोडून सध्या महाराष्ट्रासह अखंड देशाला भेडसावत असलेल्या १० महत्त्वाच्या समस्या असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन केले. या समस्या म्हणजेच महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता व दारिद्रय. या होय. यासोबतच यावेळी आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अनेक समस्या लिहून दिल्या आणि त्यांचे देखील यावेळी दहन करण्यात आले. 

उपस्थित मान्यवरांनी बाण सोडून रावण दहन केल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. तसेच या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. अशाप्रकारे  राज्यात एक नवा विक्रम आ. रोहित पवार यांनी रचला असल्याचं या माध्यमातून पाहायला मिळालं. दसऱ्याला अनिष्ट चालीरीती आणि प्रवृत्तींना थारा न देण्यासाठी त्यांचे दहन करण्याची परंपरा कायम ठेवत आपल्या या संस्कृती आणि परंपरेला अनुसरूनच राज्यातील आजवरच्या सर्वात उंच रावणाच्या प्रतिकृतिचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं यावेळी बोलत असताना आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here