![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/download-5.jpg)
देवळाली प्रवरा/ प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यात पूढील चार दिवस वादळी वारा, मेघ गर्जनेसह वीजा पडणे तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राहुरी तालूक्यातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तहसिलदार फसियोद्दीन शेख यांनी केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, भारतीय हवामान खात्याकडून दिनांक ६ ऑक्टोबर २०२२ ते १० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अहमदनगर जिल्हयात वादळी वारा, मेघ गर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्हयातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरु असून अतिवृष्टी झाल्यास धरणाव्दारे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तरी उपरोक्त नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा तर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, स्थानिक प्रशासनाव्दारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रा पासुन तसेच ओढे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट / मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जिवीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढू अथवा उतरु नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघ गर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241-2323844 या 2356940 वर संपर्क साधावा. असे प्रसीद्धी पत्रकात म्हटले आहे.