![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/IMG-20221025-WA0053.jpg)
ट्रान्सफार्मर न बसविल्यास वीज बिले न भरण्याचा ग्रामस्थांचा इशारा.
नवीन ट्रॉन्सफार्मर त्वरित बसविण्याची तेलीपाडा ग्रामविकास मंडळाची महावितरणाकडे मागणी.
उरण दि. 25 (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील तेलीपाडा गावात पूर्वी दोन ट्रान्सफार्मर होते. आता एकच ट्रान्सफार्मर असल्याने विजेची समस्या तीव्र बनली असून गावातील ग्रामस्थां तर्फे व ग्रामविकास मंडळ आणि ग्रामीण नळ पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तेलीपाडा तर्फे सदर समास्या त्वरित सोडविण्यासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता राहुल शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.
सध्या उरण तालुक्यात अनेक वेळा वीज येत आहे,जात आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड दयावे लागत आहे. असाच प्रकार उरण तालुक्यातील तेलीपाडा गावात घडत आहे. तेलीपाडा गावात एकच ट्रान्सफार्मर असल्यामुळे अनेकदा वीज जाते येते त्यामुळे फ्रिज टीव्ही असे विदयुत उपकरणांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पूर्वी या ठिकाणी दोन ट्रान्सफार्मर होते तेव्हा सर्वकाही व्यवस्थित होते. मात्र दोन ट्रान्स फार्मर पैकी एक ट्रान्सफार्मर खराब झाल्याने तो दुरुस्तीसाठी महावितरण कंपनीने कार्यालयात नेले होते मात्र दिड महिने उलटूनही दुरुस्ती साठी नेलेला ट्रान्सफार्मर महावितरण कंपनीने दुरुस्त केला नाही किंवा नविन ट्रान्सफर्मर तेलीपाडा येथे बसविला नाही. सध्या तेलीपाडा येथे एकच ट्रान्सफार्मर असून संपूर्ण गावाचा वीजेचा लोड या एकाच ट्रान्सफार्मरवर पडत आहे. यामुळे नागरिकांच्या घरातील लाईट कमी जास्त होणे किंवा लाईट येणे जाणे असे प्रकार घडत असून याचा सर्वाधिक फटका टीव्ही,फ्रिज या विदयुत उपकरणांना बसत आहे. ही उपकरणे बंद पडत आहेत. यामुळे ग्रामस्थांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार लाईट गेल्याने वारंवार आर्थिक नुकसानाला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोणतेही वादविवाद होउ नयेत व ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने पुढाकार घेऊन पूर्वी दुरुस्तीसाठी नेण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर दुरुस्त करून गावात बसवावा किंवा त्या जागी नविन ट्रान्समार्फर लावावा अशी मागणी ग्रामविकास मंडळ आणि ग्रामीण नळ पाणी पुरवठा व स्वच्छता समिती तेलीपाडा तर्फे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उरण कार्यालयात करण्यात आले आहे. सदर समस्या बाबत कार्यकारी अभियंता पनवेल, उरणचे तहसिलदार भाउसाहेब अंधारे, उरणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, चाणजे सरपंच अमित भगत यांनाही पत्रव्यवहार करून ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. जर ही समस्या सूटली नाही तर गावातील कोणतेही व्यक्ती वीज बील भरणार नाही आणी भविष्यात कोणतेही वादविवाद किंवा समस्या उद्भवल्यास त्यास सर्वस्वी महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी जबाबदार राहिल असे संतापलेल्या नागरिकांनी महावितरण कंपनीला निवेदन देताना सांगीतले.
या समस्याबाबत महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी उरण कोटनाका या कार्यालयात सहाय्यक अभियंता राहुल महादेव शिंदे यांना निवेदन देण्यात आले. व ही समस्या त्वरित सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तेलीपाडा अध्यक्ष दत्ताराम म्हात्रे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील , ग्रामपंचायत सदस्य अजय म्हात्रे, कैलास म्हात्रे, प्रल्हाद म्हात्रे, मंगेश म्हात्रे, विरेंद्र घरत, राजेंद्र म्हात्रे, ईश्वर म्हात्रे, नितिन म्हात्रे, शाम म्हात्रे, दिपराज म्हात्रे आदि तेलीपाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट (चौकट ):-
येत्या दोन ते तीन दिवसात ट्रॉन्सफार्मर बसविण्याचा आमचा प्रयत्न असेल. ग्रामस्थांना वीजेच्या अनेक समस्या येत असून त्या समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचा (अर्जाचा) विचार करून ही समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सूरु आहेत
– राहुल महादेव शिंदे
सहाय्यक अभियंता – महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी,कोटनाका – उरण