
संगमनेर : देशवासीयांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सीमेवर पहारा देत असलेल्या तालुक्यातील भारतीय सैनिकांच्या कुटूंबियांना जयहिंद महिला मंचच्या भगिनींकडून दिवाळी निमित्त दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले.
माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालयात जयहिंद महिला मंच व स्वराज सैनिक कल्याण संस्था यांच्या वतीने तालुक्यातील आजी – माजी सैनिकांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे, सौ.निर्मलाताई गुंजाळ, सौ.सुनंदाताई दिघे, सौ.प्रमिलाताई अभंग, आशा वाकचौरे, छाया उपाध्ये, शिला करंजेकर, जुलेखा शेख, सुनिता कांदळकर,भिकाजी भागवत, प्रकाश कोटकर, भानुदास पोखरकर,सुभाष कुडेकर, जगन्नाथ खामकर सर,काशिनाथ खिलारी, सुनिल थोरात,प्रवीण गुंजाळ, विक्रम थोरात,संजय रहाणे, शिवाजी रहाणे, संजय अभंग आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या कि, भारतीय सैनिक हे कायम आपल्या परीवारापासुन हजारो किलोमीटर दूर असतात.सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाहीत. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या जनतेसाठी कामावर असतात.रात्रंदिवस ऊन ,वारा,पाऊस ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. ते दिवाळी किंवा इतर सणांना देखील कुटूंबियांसोबत नसतात. त्यामुळे त्यांच्या प्रति आदर भावना व्यक्त करताना तालुक्यातील बचत गट,महिला मंडळ यांच्या कडून सैनिकांना दिवाळीचे विविध फराळाचे पदार्थ उच्च प्रतिच्या पॅकिंगमध्ये त्यांच्या कुटूंबियांना दिले आहेत. या अभिनव उपक्रमात तालुक्यातील अनेक कुटुंबही सहभागी होणार आहे.माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात,आ. डॉ.सुधीर तांबे यांनी कायम सैनिकांचा सन्मान व आदर केला असून त्यांना फराळ पाठविण्याच्या संकल्पनेचे कौतुक केले आहे.
यावेळी निवृत्त सैनिक प्रकाश कोटकर,सुनिता कांदळकर, शीला करंजेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महिला, कार्यकर्ते, आजी-माजी सैनिक व त्यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.