![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/09/IMG-20220925-WA0098.jpg)
हिंदू धर्मात अश्विन महिन्यात घटांमध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलीत करून आदिमायेची पुजा करणे म्हणजेच नवरात्रोसव होय. या काळात सूर्य ,चंद्र व इतर ग्रहांत परिवर्तन होतो व त्याचा परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होतो म्हणून या काळाला परिवर्तन काळ समजतात, ऋतूचा हा बदल म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे आदिमाया आहे.
उपासना, संयम ,ब्रह्मचर्य व यज्ञ हे सर्व या काळात केल्याने मनुष्याला नवी उमेद, उत्साह ,आरोग्य ,स्मरणशक्ती व बौद्धिक विकास होऊन आत्मा शुद्ध होतो, म्हणूनच हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला फार मोठे महत्त्व आहे.
त्यातील उमा, गौरी, पार्वती, जगदंबा ,भवानी ही सौम्य रूप तर दुर्गा ,काली ,चंडी ,भैरवी, चामुंडा ही उग्र रूप
नवरात्रीत देवीची पुजली जाणारी नऊ रूपे म्हणजे
१. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी ३. चन्द्रघंटा ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी) ५. स्कंदमाता ६. कात्यायनी ७. कालरात्री ८. महागौरी ९. सिद्धिदात्री
उरण तालुक्यात काही गावात देवींची अनेक मंदिरे आहेत ,त्यातील काही निवडक नऊ पाषाणी मूर्तीं व मंदिरांच्या माहिती बद्दल केलेला हा अल्पसा प्रयत्न .
उरणचा इतिहास तसा फारच जुना आहे इतिहासकार व चाणजे शिलालेख यांच्या मते इ.स. ११३९ साली राजा आपरादित्यदेव यांचे इथे राज्य असावे ,
पुढे या भागावर परधर्मीय शत्रूंचे आक्रमक हल्ले झाले ,त्यात काही मंदिरे उध्वस्त झाली तर काही भाविकांनी शत्रूंपासुन देवांच्या मूर्ती पाण्याखाली तर काही जमिनीखाली लपवून ठेवल्या .
कालांतराने त्यातील काही मूर्ती भाविकांच्या हाती कशा लागल्या व त्यावर हा प्रकाशझोत.
आजच्या देवीचे पहिले रूप
*शैलपुत्री*
शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या,मुलगी.देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते.भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर,निडर आणि शांत होण्यास मदत होते.
जाणून घेऊया उरणच्या पहिल्या देवीची माहिती ….
*उरणची उरणावती देवी*
इ.स.१५४२ मध्ये महादेव रामजी यांनी देऊळवाडी वसवले,तिथे स्मशानभुमी व फक्त एक छोटेसे शिवमंदिर होते तेथील रहिवासी *जानु गुरव* यांच्या स्वप्नात नेहमी देवी यायची ,एक दिवस आपल्या ओळखीच्या ब्राम्हणाला घेऊन देवीने सांगितलेल्या ठिकाणी म्हणजे आताची ओ.एन.जि.सी.कंपनी येथे खोदले असता पाषाणाची मूर्ती सापडली ,तेथे सर्व जंगल म्हणजे वन होते, शिवमंदिराच्या बाजूलाच देवीचे मंदिर बांधले आहे ,वनाच्या उरातुन आलेली ही देवी म्हणजे ऊरणावतीदेवी.
उरणचे नाव पहिले उर-वत-वन, दुसरे उरवन, तिसरे ओरण व चौथे याच देवी मुले उरण हे नाव पडले. लेखक – अजय शिवकर ।