विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने दहा एकर ऊस जळून खाक ; नेमबाई माळ शिवारातील घटना

0

संगमनेर : विजेच्या तारांची ठिणगी पडल्याने पाच शेतकऱ्यांचा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी तालुक्यातील ओझर खुर्द परिसरात असणाऱ्या नेमबाई माळ शिवारात घडली.

          याबाबतची माहिती अशी की नेमबाई माळ पायथ्यालगत सावित्रीबाई दत्तू साबळे, विठाबाई लक्ष्मण साबळे, उज्वला शिवराम साबळे, बनाजी बालाजी साबळे व मधुकर सखाराम ठोसर यांची शेती आहे. या शेतीत ऊस आहे. या पाचही शेतकऱ्यांच्या  उसाच्या शेताला काल शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज वाहक तारांची ठिणगी पडल्याने आग लागली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. उसाच्या फडाला आग लागल्याचे समजताच स्थानिक शेतकरी ओझर खुर्दचे सरपंच पुंजा हरी शिंदे, बकचंद साबळे, लक्ष्मण साबळे, विठ्ठल साळुंखे, कैलास गोराणे, जयराम कांदळकर, कचरू शिंदे, भिका कांदळकर, दौलत बनवाले, साहेबराव उंबरकर, झुंगा साबळे, जगन शिंदे, शिवराम साबळे, मधुकर ठोसर, बनाजी साबळे, जिजाभाऊ शिंदे, विनायक कांदळकर, कारभारी साबळे, धोंडीबा बनवाले, दत्तू शिंदे आदी शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांना त्यात यशही आले. त्यामुळे शेजारील शिवारात असणारा शेकडो एकर ऊस आगीपासून वाचला. दरम्यान आगीची घटना समजल्यावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. मात्र तोपर्यंत वरील पाच शेतकऱ्यांचा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग विजेच्या तारांच्या ठिणगीमुळे लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले असले तरी नेमकी ही आग कशामुळे लागली हे मात्र अधिकृतरित्या समजले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here