![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/78ce639a40fa4ae9b7664edfb70fe2cd.jpg)
संगमनेर : तालुक्यातील खंदरमाळवाडी जवळील येठेवाडी येथील चार लहान मुलांच्या मृत्यूस विज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा समोर आला असून, यामध्ये दोषी व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. तसेच मृत मुलांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत जाहीर करत या भागातील सर्व आदीवासी कुटूंबियांच्या घरकुलांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनास दिल्या. वादळीवाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या विज वितरण कंपनीच्या वीज वाहक तारा तातडीने पुर्ववत करण्यासाठी वीज वितरण कंपनीने विशेष मोहिम जिल्हयामध्ये हाती घेण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सुचित केले.
खंदरमाळवाडी येथील घटनेची गंभीर दखल घेवून पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी येठेवाडी गावात येवून बर्डे कुटूंबियांची सांत्वनपर भेट घेवून त्यांना दिलासा दिला. शनिवारी रात्री मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतरही अंत्यविधी न करण्याचा निर्णय कूटूंब आणि ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या चारही मुलांवर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी मंत्री विखे पाटील यांनी येठेवाडी येथील ग्रांमस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी एकत्रितपणे चर्चा करुन गावातील प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. अधिकाऱ्यांना या प्रश्नांबाबत गांभिर्याने निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच कालची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. वीज वितरण कंपनी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि स्व.गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेतून मृत मुलांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.