संवत्सर येथील हरिनाम सप्ताहाची सांगता

0

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

संवत्सर (वार्ताहर) दि. २५ ऑगस्ट २०२२

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. पढेगांव येथील ह. भ. प. सुभाष महाराज जगताप यांच्या काल्याच्या किर्तनानंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजन, किर्तन, श्रीकृष्ण चरित्र आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी गेले सात दिवस संवत्सरगांव गजबजून गेले होते.

प. पू. वै. रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व. नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पन्नास वर्षापासून संवत्सरगांवात हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. यावर्षी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील, उपसरपंच विवेक परजणे, सरपंच सौ. सुलोचना ढेपले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

काल्याच्या किर्तनातून ह. भ. प. जगताप महाराज यांनी श्रीकृष्ण चरित्रावर विचार व्यक्त केले. श्रीकृष्णासारखा सर्वतोपरी अद्वितीय पुरुष हिंदुस्थानातच काय पण संपूर्ण विश्वात आजवर झाला नाही. अलौकीक पराक्रम, अप्रतिम बुध्दीमत्ता असामान्य स्वार्थत्याग अंगी बाणलेला असा हा अवतारी पुरुष प्रत्येकाच्या मनात परमेश्वराचा अवतार म्हणून ठाई ठाई विराजमान झालेला आहे. श्रीकृष्णाचे चरित्र अत्यंत दिव्य असून कृष्णलीलांचे वर्णन शब्दातून व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी श्रीकृष्ण चरित्रात एकरूप व्हावे लागेल. ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी मी पुन्हा अवतार घेईन आणि धर्मरक्षण करेल असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमधून सांगितले आहे. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता म्हणजे प्रत्येकाच्या जीवनाचे सार आहे. कसे जगावे, कसे वागावे याचे सुंदर मार्गदर्शन गीतेतून मिळते असे सांगून ह. भ. प. जगताप महाराज यांनी संवत्सर येथे आयोजित केल्या गेलेल्या सप्ताहाच्या निटनेटक्या नियोजनावद्दल आयोजकांचे कौतूक करुन हा सोहळा भविष्यातही असाच अखंडपणे सुरू रहावा यासाठी शुभेच्छा दिल्या.

सप्ताहात संवत्सरसह कोकमठाण, दहेगावबोलका, सडे, वारी, कान्हेगांव, भोजडे आदी गांवातील भजनी मंडळे सहभागी झाली होती. संवत्सर परिसरातील रामवाडी, लक्ष्मणवाडी, दशरथवाडी, विरोबा चौक या ठिकाणच्या भजनी मंडळांनी रात्रंदिवस पहारा दिला. च्या सांगता समारंभानंतर आमटी भाकराचा महाप्रसाद देण्यात आला. सांगता समारंभात सर्वश्री विवेक परजणे, खंडू फेपाळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव सावळे, दिलीपराव ढेपले, ज्ञानदेव कासार, सुभाष लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, चंद्रकांत लोखंडे, कोळपेवाडी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे, संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष फकिरा वोरनारे, अॅड. शिरीष लोहकणे, अशोक लोहकणे, निवृत्ती लोखंडे, बाळासाहेब दहे. दत्तात्रय शेटे, सूर्यभान परजणे, बाळासाहेब गायकवाड, अविनाश गायकवाड, यांताराम परजणे, जितेंद्र बोरसे, वाल्मिक महाराज जाधव, नामदेव पावडे, भिकन कर्पे, हवीय तांबोळी, गोकूळ गंगुले, अरुण पगारे, जगन पेकळे, सुभाष विडवे, भाऊसाहेब ढेपले. लहानू बढे, भागाजी भोकरे यांच्यासह प्रचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेश आबा परजणे फौन्डेशनच्या सदस्यांसह नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय, जनता हायस्कूल, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. सप्ताह काळात योगदान देणाऱ्या पुरुष व महिलांचा यावेळी सत्कार व गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here