सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस ; माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील  

कोरोनाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यावर्षी अनेकांची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना शेतकरी वर्ग मात्र परतीच्या पावसाने प्रचंड अडचणीत आला आहे. या कठीण परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला पाहिजे होते. मात्र सध्या सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस सुरू आहे.प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र मदत मिळत नसल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोडले.

          दीपावलीनिमित्त संगमनेरात पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. अतिवृष्टी आणि परतीच्या मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेली आहेत. अशा संकट काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. ही सर्वांची अपेक्षा होती. मात्र सरकारकडून वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनल वरून फक्त घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळत नाही. काही लोक दौरे करून फक्त वर्तमानपत्रात फोटो टाकतात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत नाही ही वस्तुस्थिती आहे.पीक विमा कंपन्या कायमच नफा खोरी करण्याचा प्रयत्न करत असून अनेक वर्षापासून नफा मिळवण्यासाठी या कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो.  हा अन्याय होऊ नये आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने बीड पॅटर्न तयार केला होता. मात्र त्याला केंद्राने मान्यता दिली नसून यावर काय अंमलबजावणी होते ते भविष्यात कळेल.महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना सुद्धा त्यांनी दौरे केले. त्यांच्या समवेत आम्हीही विविध भागांमध्ये दौऱ्यामध्ये सहभागी झालो होतो. त्यामुळे त्यांनी दौरे केले नाही हे विरोधकांचे म्हणणे राजकीय असल्याचे ही आमदार बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेे विषयी बोलताना माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा ही लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी आहे. या यात्रेला संपूर्ण देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून या यात्रेला कोणत्याही पक्षाचेे बंधन नाही. देशात लोकशाहीचे, बंधूूभावाचे व खुले वातावरण रहावे यासाठी लोकशाहीच्या विचारावर विश्वास असणाऱ्या सर्व पक्ष व संघटना भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होत असून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याचे सांगत आमदार थोरात म्हणाले की महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचे अभूतपूर्व स्वागत होईल असेे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here