उरणकरांवर आता पाणी संकट; आठवड्यातून तीन दिवस होणार पाणी कपात .

0

पाणी जपून वापरण्याचे प्रशासन तर्फे आवाहन.

उरण दि. 30 (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणा-या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने उरणकरांना आता पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. उरणला पाणीपुरवठा करणा-या रानसई धरणात 4.655 MCM एवढाच पिण्याचा पाणीसाठा उपलब्ध आहे. शिवाय या वर्षी दिघोडे बार्टर व्यवस्थेतून पाणी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तर्फे उरण नगर परिषद  हद्दीत व  उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींना दि 1/1/2023  पासून मंगळवार, शुक्रवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.तशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे रविंद्र चौधरी -उप अभियंता म औ. वि. म उपविभाग उरण यांनी कळविले आहे.

उरण मध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच आहे, दररोज नवनविन औद्योगिक प्रकल्प येत आहेत. विविध विकास कामे, द्रोणागिरी नोड सारखे नव्याने वसलेले अत्याधुनिक वसाहत, जे एन पी. ए(जेएनपीटी )सारखे आंतरराष्ट्रीय बंदर यामूळे पाणी पुरवण्याची मागणी अधिक वाढली आहे. यामूळे पाणी पुरवठ्याची तूट वाढत आहे. याकरीता आठवड्यातून तीन दिवस (मंगळवार, शुक्रवार व रविवारी )नगरपरिषद व उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचयतींना पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही तोपर्यंत आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.हा पाणीपुरवठा जून महिन्या पर्यंत बंद करण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचे योग्य ते नियोजन करून पाणी वापरावे. पाणी वाया घालवू नये असे आवाहन उपअभियंता रविंद्र चौधरी यांनी  नागरिकांना केले आहे.

60 वर्षापूर्वी उभारलेल्या रानसई धरणात गेल्या 60 वर्षात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने पाणी साठवणूक क्षमता 4.655 MCM वर आला आहे. एम आय डी. सी ला सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोजचे 10 MLD पाणी उसने घ्यावे लागत आहे. मात्र सिडको तर्फे पाणी पुरवठा होत नसल्याने तीन दिवसाचा पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. रानसई धरणाची उंची वाढविल्यास मात्र ही पाणीटंचाई / पाणीकपात टाळता येऊ शकते मात्र रानसई धरणाच्या उंचीचा प्रस्ताव गेली 10 वर्षे धूळ खात पडून आहे. त्यामुळे उरण मधील नागरिकांना पाणी उसने घ्यावे लागत असून नोव्हेंबर पासूनच नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांना आता विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. उरण मध्ये आठवड्यातून तीन दिवस पाणी कपात होणार असल्याने उरण मधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पाणी कपातीच्या निर्णयामुळे उरण मधील विविध विकास कामे, प्रकल्पावर, कंपनी, जेएनपीटी (जेएनपीए )बंदरावर याचे वाईट परिणाम होणार आहेत. पाण्या अभावी विविध विकासकामे रेंगाळण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here