जिल्ह्यात विशेष मोहीमेत ५७१३ जात वैधता व जात प्रमाणपत्रांचे वाटप !

0

सामाजिक न्याय पर्व’ व ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात कामगिरी

      अहमदनगर, दि. १९ मे २०२३ (जिमाका वृत्तसेवा) :- अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने ‘सामाजिक न्याय पर्व’ व ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रमात ५७१३ विद्यार्थ्यांना जात वैधता व  जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १ ते ३० एप्रिल, २०२३ या कालावधीत ‘सामाजिक न्याय पर्व’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तर १५ एप्रिल पासून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत जिल्हा समितीच्या वतीने १७३६ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी यांच्याशी समन्वय ठेवत त्यांच्या माध्यमातून ३९७७ विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच वितरित करण्यात आले आहेत. उपक्रमांतर्गत इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी जिल्हा समितीच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

         ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रम आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे. आणि त्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन भरलेले नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्याचेही जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करुन ते अर्ज अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह  (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत स्वत: किंवा वडिल/भाऊ/बहिण/आई यांनी समक्ष जमा करावेत. जेणेकरून त्यांच्य प्रकरणांवर समितीस वेळेत  निर्णय घेता येतील. असे आवाहन ही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दलालापासून सावध राहण्याचे आवाहन

      अर्जदारांनी अर्ज भरतांना स्वत:चा ईमेल व मोबाईल क्रमाकांव्दारेच अर्ज नोंदणी करावा. सर्व मूळ कागदपत्र अपलोड करण्यात यावीत व आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात यावा. समितीने त्यांचे प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/ जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर प्राप्त होत असते. त्यामुळे कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे संपर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तीच्या अमिषास बळी पडू नये. अशा त्रयस्थ व्यक्तीकडून नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्जदारांनी आपले अर्ज स्वतः व्यवस्थितरित्या परिपूर्ण सादर करावे. अन्य कोणत्याही कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये. असे आवाहनही जिल्हा समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here