एका तरुणाचा मृतदेह चौथ्या दिवशी मिळुन आला.
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
सायंकाळी सुमारास पोलिस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच दोन तरुणांनी राहुरी तालुक्यातील वावरथ परिसरात मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली. दोघां पैकी एकजण पोहून बाहेर निघाला. मात्र रामा माळी हा तरुण पाण्यात बूडाला.तब्बल चार दिवसा नंतर त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला.
लक्ष्मीबाई भागवत बाचकर, वय ६५ वर्षे, रा. जांभळी, ता. राहुरी व त्यांचा मुलगा अंबादास हे दोघे त्यांच्या घरात झोपी गेले होते. दि. ९ जुलै रोजी १२.३० वाजे दरम्यान तीन भामटे बाचकर यांच्या घरात घुसले आणि लक्ष्मीबाई बाचकर यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व कानातील फूले ओरबाडून घेतली. तसेच पेटीतील सोन्याचे दागीने असे चार तोळ्याचे दागीने घेऊन पळून जात होते. तेव्हा लक्ष्मीबाई यांच्या मुलाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता भामट्यांनी लक्ष्मीबाई व त्याच्या मुलगा अंबादास यांना काठीने मारहाण करून ते पसार झाले होते. लक्ष्मीबाई भागवत बाचकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवि (पुर्ण नाव माहीत नाही), रा. जांभळी, ता. राहुरी, व त्याचे सोबतचा एक अनोळखी इसम अशा दोन जणांवर गुन्हा रजि. नं. ७६०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजे दरम्यान राहुरी येथील पोलिस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठीच वावरथ येथे गेले. तेव्हा पोलिस पथक पकडायला आल्याची चाहूल लागताच रामा ज्ञानदेव माळी, वय २९ वर्षे व संदिप बर्डे, वय २७ वर्षे, रा. गंगाधर वाडी, वावरथ जांभळी, ता. राहुरी, या दोन तरुणांनी मुळा धरणाच्या पाण्यात उडी मारली. दोघां पैकी संदिप बर्डे हा पोहून बाहेर आला. मात्र रामा माळी हा तरुण पाण्यात बुडाला. पोलिस प्रशासनाने सलग तीन दिवस धरणाच्या पाण्यात त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. तब्बल चार दिवसांनी आज दि. १३ जुलै २०२५ रोजी रामा माळी याचा मृतदेह धरणाच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला.
पोलिस प्रशासनाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहे.