कोणत्या कारखान्याचा भांडेफोड करणार, सरकारसह साखर कारखानदारांना काय इशारा देणार?
![](https://www.pressalert.in/wp-content/uploads/2022/10/download-30-1.jpg)
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
ओला दूष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रूपयांची मदत मिळावी, शेती पंपाचे भारनियमन रद्द करून विनाकपात दिवसा १२ तास विज मिळावी, कारखान्यांनी काटा मारुन करीत असलेली लूट थांबवून सर्व कारखान्याचे काटे ऑनलाईन करून नियंत्रित प्रणाली विकसित करण्यात यावे.ऊसाची रीकव्हरी चोरून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशा विविध प्रमुख मागण्या संदर्भात आवाज उठविण्यासाठी राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या पुढाकारातुन मंगळवार १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथिल ऊस परिषदेत माजी खा. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारसह साखर कारखानदारींना काय इशारा देणार याचीच उत्सुकता लागली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलनातून आवाज उठवत राजू शेट्टी कायमच राज्यात चर्चेत असतात.
कोल्हापूर जिल्ह्यात उसाला योग्य भाव मिळवून एफआरपी मिळावा या मागणीसाठी कित्येक आंदोलन राजू शेट्टी यांनी केले. तसेच या आंदोलनामुळे मागण्यांचा विचार देखील करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी हे नगर जिल्ह्यातील कोणकोणते कारखाने नियमानुसार ऊसाला भाव देतात. यावर भूमिका मांडण्याची शक्यता आहे. ऊस परिषदेच्या माध्यमातून काय भूमिका मांडणार ऊस परिषदेत कळणार आहे. मंगळवार दि. १ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या ऊस परिषदेस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.