कोपरगाव: कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणून शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या गुंडांना धडा शिकविणे गरजेचे असून पोलिसांचा अभय असणाऱ्या आणि राज्याश्रय असणाऱ्या गुंडाचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढल्याचे निदर्शनास आलेले आहे.महिला भगिनींना शहरात वावरत असतांना मवाली प्रवृत्तीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असल्याचे दिसते. बदनामीच्या भीतीपोटी बऱ्याचदा अनेक मुली-महिला असे गैरप्रकार सहन करतात- तक्रारी द्यायची टाळाटाळ करतात. त्यामुळेच गुंड प्रवृत्तीच्या युवकांचे चाळे वाढतच चाललेले दिसतात. कुठल्या ना कुठल्या तरी पक्ष किंवा संघटनेचे संरक्षण घेऊन शहरात काही गुंड माजलेले आहेत.मतांच्या राजकारणामुळे त्यांच्याविरोधात जास्त कुणी बोलत नसल्याने शहरातील महिलांना असुरक्षित वाटत आहे.
अशा अपप्रवृत्तीविरुद्ध बोलण्याचे धाडस न करता अनेकजण हे करा- ते करा
अशा बातम्यांचा रतीब घालण्यातच मग्न असलेले दिसतात.कुठलाही संघर्ष न करता,आंदोलन न करता,तुरुंगात न जाता नाही,नेत्यांविरुद्ध एकही शब्द न बोलता प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हेच काहींचे समाजकार्य आहे.एकमेकांविरुद्ध मेसेज पाठविण्यातच आपण समाधान मानतो हेच घातक आहे.
पण काही कार्यकर्ते मात्र अतिशय तळमळीने प्रश्न मांडतात, आंदोलने करतात हे फारच समाधानकारक आहे.
आपल्या शहरातील गुंडगिरी-महिलांची छेडछाड आपल्याही घरापर्यंत येऊन पोहोचू शकते याचे भान आपल्या सर्वांनाच आले तर बरे होईल. अन्यथा गुंड अजून माजले तर शहरवासीयांना येथून पुढच्या काळात अवघड होईल यात शंका नाही.महिलांची-मुलींची छेडछाड करणारे,शहरात दादागिरी करणारे कुठल्याही जाती धर्माचे असोत,त्यांचा बेत सर्वांनी मिळून पहायला हवा.अशावेळी मतांच्या राजकारणाचा विचार कुणीही करू नये,असे करणाऱ्या राजकारण्यांना जनताच लक्षात ठेवील हे संबंधितांनी ध्यानात घ्यावे.
शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनास सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.अन्यथा वातावरण बिघडून लहान मोठ्या दुकानदारांचेच नुकसान होते.काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर हात उचलला गेल्याने आता शहरात बेकायदेशीर टपऱ्या वाढलेल्या दिसतात.आजही काही तथाकथित नंगट पुढारी फेरीवाले-हातगाडीवाले यांच्याकडून हप्ते वसूल करतात. त्यांच्याविरुद्ध कुणी बोलायलाही तयार नाही.
गुंड कुठल्याही पक्षाचा किंवा जाती धर्माचा असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.कोपरगाव शहर पोलीस विभागाचे इन्स्पेक्टर रामराव ढिकले व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शहरासाठी त्रासदायक असलेली गुंडगिरी व रस्त्यांवर अडथळे करणारी अतिक्रमणे यांचा कठोरपणे बंदोबस्त करावा हिच नागरिकांची अपेक्षा आहे.
त्याचप्रमाणे सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांसाठी फेरीवाला झोन ची त्वरित अंमलबजावणी करावी.अशी मागणी वहाडणे यांनी केली आहे.