फलटण प्रतिनिधी :
लग्न लावण्याच्या आमिषाने एका तरुणास पळवून नेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की दि. 28 एप्रिल रोजी सांगवी ता. फलटण गावच्या हद्दीतील फिर्यादी तानाजी नाना घोलप यांचा मुलगा प्रथमेश तानाजी घोलप वय 18 , व्यवसाय शिक्षण, याचे फिर्यादीच्या मेव्हणीच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याने दि. 27 एप्रिल रोजी अमोल बबन गायकवाड वय 42, रा.जंक्शन, साईनगर, ता. इंदापूर जि. पुणे, समीर महादेव सोनवणे ३३, अजय अरुण सोनवणे 34, अरुण साहेबराव सोनवणे ६६, सर्वजण रा. भवानीनगर ता. इंदापूर जि. पुणे यांनी फिर्यादीच्या घरी येऊन प्रथमेश याला तू आमच्याबरोबर चल, आम्ही तुझे नंदिनीशी लग्न लावून देतो, असे सांगत फिर्यादीचे काही ऐक न ऐकता प्रथमेशला जबरदस्तीने गाडीत बसवले व भवानीनगर , सणसर येथे घेऊन गेले. तेथे तू आमच्या मुली बरोबर बोलावयाचे नाही, अन्यथा तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देईन आणि आम्ही तुझे लग्न नंदिनीशी लावणार नाही असे म्हणून त्रास दिला. त्यानंतर दि 28 एप्रिल रोजी साडेबारा वाजता सांगवी ता. फलटण येथे प्रथमेशने घराच्या पत्राच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून एका गुन्ह्यात फिर्यादी तानाजी नाना घोलप यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी चार जणांच्या विरोधात पळवून नेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक दीक्षित करीत आहेत. तर दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादी प्रसाद तानाजी घोलप यांनी प्रथमेशने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अडसूळ करीत आहे.