भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू मागील चार वर्षांपासून संघाच्या बाहेर आहे. तसं पाहिलं तर चार वर्षांपूर्वीच त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं आहे. पण अद्यापही त्याने निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलेलं नाही. भारतीय संघात पुनरागमन कऱणं त्याच्यासाठी जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूसमोर संन्यास घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय नाही. आगामी दिवसात जर या खेळाडूने निवृत्ती जाहीर केली तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. मागील 4 वर्षांपासून निवडकर्तेदेखील त्याच्याकडे दुर्लक्ष करत असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी नाकारत आहेत.
भारताचा जलदगती गोलंदाज ईशांत शर्माला मागील 4 वर्षांपासून भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळत नाही आहे. मनात आशेचा किरण असल्याने ईशांत शर्माने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही. सध्याची स्थिती पाहता त्याचं संघात पुनरागमन होणं अशक्य दिसत आहे. ईशांत शर्मा आता 36 वर्षांचा असून, निवड समितीही आता त्याला विसरली असेल.
भारतीय संघाचे दरवाजे बंद
ईशांत शर्माकडे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीसाठी आता जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि अर्शदीप सिंगसारखे यांच्यासारखे पर्याय आहेत. याशिवाय नितीश रेड्डी आणि शार्दुल ठाकूर यांचेही अष्टपैलू खेळाडू म्हणून मजबूत दावे आहेत. म्हणूनच निवडकर्त्यांनी ईशांत शर्माला दुधातील माशी झटकल्याप्रमाणे भारतीय संघातून वगळलं आहे.
भारतीय संघात निवड होणं अशक्य
ईशांत शर्माने नोव्हेंबर 2021 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कानपूर कसोटीत इशांत शर्मा शेवटचा खेळताना दिसला होता. त्या सामन्यात तो एकही विकेट घेऊ शकला नव्हता. नोव्हेंबर 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या कानपूर कसोटीनंतर, ईशांत शर्माला पुन्हा कधीही भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.
2007 मध्ये केलं होतं पदार्पण
ईशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 311 विकेट्स घेतल्या आहेत. ईशांतने आतापर्यंत 80 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 115 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 मध्ये मात्र इशांत शर्माला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. त्याने 14 टी-20 सामन्यांमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत.
ईशांत शर्माने 2007 मध्ये पदार्पण करत भारतीय संघाकडून पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर, पुढच्याच महिन्यात ईशांतला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. 2016 नंतर इशांत शर्मा एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही.