वाठार स्टेशन : महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आचली, मजरेवाडी, देवसरे, घावरी, विवर आणि सौंदरीसह पंधरा प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
स्थानिकांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय धरण प्रकल्पास कोणतीही संमती दिली जाणार नाही, असा ठराव नवी मुंबई येथील घणसोली येथे आयोजित केलेल्या बैठकीत सोळशी सामाजिक संघर्ष समितीने केला. या बैठकीत माजी सभापती संजय बाबा गायकवाड यांनी सांगितले की, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याशी थेट संवाद साधून गावकऱ्यांच्या मागण्या पोहोचवल्या असून, आपल्याला शंभर टक्के न्याय मिळेल. बैठकीसाठी या प्रकल्पग्रस्त गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. आमचा विकासाला विरोध नाही, पण जमिनींचा योग्य मोबदला, महाबळेश्वर तालुक्यातच पुनर्वसन आणि हक्काची घरे मिळाल्याशिवाय प्रकल्पास मान्यता नाही, असा ठाम सूर बैठकीतून उमटला. सोळशी सामाजिक संघर्ष समितीने लढ्याचे नेतृत्व करण्याचा निर्धार व्यक्त करत न्याय न मिळाल्यास तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
या बैठकीला महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती संजय गायकवाड, सोळशी सामाजिक संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घाडगे, शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख संतोष आप्पा जाधव, बारा गावं संघर्ष समिती प्रमुख प्रकाश गायकवाड, शिवसेना उपविभाग प्रमुख रमेश सकपाळ, शिवसेना शाखाप्रमुख गोरेगाव विभाग अंकुश मोरे, उद्योजक विलास जाधव, अरुण मोरे, संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्रीरंग मोरे, विश्वनाथ घाडगे, रमेश जाधव, सुनील जाधव, तानाजी सकपाळ, प्रकाश सकपाळ, राजेंद्र घाडगे- पाटील, महेंद्र घाडगे, सतीश मोरे, अरुण मोरे,रमेश जाधव, चंद्रकांत जाधव, गणेश गायकवाड, सुनील जाधव, शैलेश जाधव, नितीन दादा घाडगे, सुनील गुरुजी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सोळशी धरण प्रकल्प काय आहे?
सोळशी (ता. महाबळेश्वर) गावासह पंधरा गावांत सोळशी धरण उभारले जाणार आहे. या भागातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात जाणारे पाणी अडवून बोगद्यामार्गे बलकवडी(ता वाई) धरणात सोडण्यात येणार आहे. या धरणाचे पाणी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग व फलटण मार्गे मराठवाड्याकडेही नेण्याचा प्रस्ताव आहे. या धरणग्रस्तांचे महाबळेश्वर तालुक्यातच पुनर्वसन करण्यात यावे, अशी या गावातील धरणग्रस्तांची प्रमुख मागणी आहे. या भागाचे लोकप्रतिनिधी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा धरणग्रस्तांच्या मागणीला पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मकरंद पाटील आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.