ना.राधाकृष्ण विखे पाटील व माजी आ.शिवाजीराव कर्डीले यांना धक्का ; मामा काँग्रेस तर भाचा शरद पवार गटात प्रवेश.
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
महसुलमंञी राधाकृष्ण विखे पाटील व माजी आ.शिवाजीराव कर्डीले या दोन्ही नेत्यासह भाजपाला राहुरी मामा भाचे यांनी चांगलाच धक्का दिला असुन ना.विखे यांचे निकटवर्तीय तथा मामा रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांचे भाचे भाजप युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष धिरज पानसंबळ यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने ना.विखे पाटील व माजी आ.कडीले यांच्यासह भाजपाला राहुरी तालुक्यात मोठे खिंडार पडले आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात भाजपाला मोठी गळती लागलेली असून गेल्या तीन महिन्यांच्या आत किमान दीड डझनपेक्षा जास्त भाजपाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला. तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे तालुक्यातील भाजपाचे बळ घटले असून आगामी निवडणूक भाजपासाठी सोपी राहिलेली नाही याचे संकेत मिळत आहेत.

भाजपाच्या ओबीसी आघाडीचे तालुका संघटक महेश पर्वत, संतोष अंत्रे, भाजपाचे ज्येष्ठ नेते गेणू तोडमल, संजय शिंदे, जनाब अफजल, केशवराव अंत्रे, सोमठाणे खुर्द चे सरपंच आणि भाजपाचे नेते पांडूरंग शिदोरे, बबन जाधव, शेखर कराळे, ताहाराबादचे पोपटराव किनराव,सुधाकर जागरे अशोक मुसमाडे, भीमराज बेलकर आणि शिवराज तांबे यांनी सप्टेंब महिन्यात भाजपाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याखेरीज भाजयुमोचे जिल्हा सरचिटणिस किरण अंत्रे, प्रशांत अंत्रे आणि सोनगाव ग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र अनाप यांनी ऑगस्टमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. याच महिन्यात भाजपाचे नेते धीरज पानसंबळ यांनीही भाजपाला रामराम ठोकला आहे.
राहुरी येथील धिरज पानसंबळ यांनी सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम केले होते. काही महिन्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजप युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष पद देण्यात आले होते. परंतू त्या ठिकाणी त्यांचे विचार जुळले नाही.
१४ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचे युवा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, तसेच भाजपचे ललित दुधाडे, राहुरी खुर्द येथील युनूस शेख, सिद्धार्थ गायके व सागर काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहिर प्रवेश केला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र सोनवणे हे उपस्थित होते.
धिरज पानसंबळ यांची अखेर घरवापसी झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पून्हा घरवापसी केल्याने भाजपला पून्हा एकदा मोठा धक्का बसलाय. यामुळे निश्चितच आमदार प्राजक्त तनपूरे यांचे हाथ बळकट झाले असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपूरे यांना फायदा होणार आहे.
भाजपाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला. तालुका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे यांनी याच महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.माजी आ.शिवाजीराव कर्डीले व चाचा तनपुरे यांचे सुत बसेना त्यामुळे तनपुरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देवून काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या लोकसभा निवडणूकीतील पराभवानंतर भाजपा बॅकफूटवर आहे. त्यामुळेच ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला गळती लागली आहे. राहुरीत कर्डीले गटाची दाणादाण उडाली असून अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांनी देखील भाजपाची साथ सोडली आहे. बहुतांश नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आसरा घेतला आहे. यामुळे संभाव्य लढतीत प्राजक्त तनपुरे यांची ताकद वाढल्याचे चित्र असून भाजपाला झुंजावे लागेल अशी स्थिती आहे. कर्डीले गटात यामुळे अस्वस्थता पसरली आहे.
तसेच राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील भाजपचा एक वजनदार माजी पदाधिकारी लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समजत आहे. त्यामुळे भाजपला तालुक्यात मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.