कोपरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत ४८ मोठे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक विकासासाठी व विस्तारासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने पीएसीएस व एफपीओअंतर्गत विविध १५१ व्यवसाय सुचवले असून, कोपरगाव तालुक्यातील सक्षम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी व देशात नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.
बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी (२२ सप्टेंबर) एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी ए. डी. काटे, नाशिक येथील कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भूषण निकम यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (पीएसीएस) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन-एफपीओ) अंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी करावयाच्या व्यवसायाची सविस्तर माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत बिपीनदादा कोल्हे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, माजी उपाध्यक्ष साहेबराव कदम, संचालक रमेश आभाळे, सतीश आव्हाड यांनी केले. बहादरपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हरिदास रहाणे यांचा बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक कारखान्याचे सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी केले.
केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व सहकारी संस्थांच्या विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले असल्याचे सांगून बिपीनदादा कोल्हे म्हणाले, गावपातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे शेतकऱ्यांच्या व गावच्या विकासात मोठे योगदान आहे. या सहकारी संस्थांना उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी १५१ व्यवसाय सुरू करण्याची संधी देणारी महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी संस्थांना पेट्रोल पंप, खत, बी-बियाणे व इतर कृषी निविष्ठा विक्री केंद्र, मायक्रो एटीएम सेंटर, सुपर मार्केट, जेनेरिक औषधी केंद्र, गॅस वितरण, कॉमन सर्व्हिस सेंटर, सेंद्रिय शेती, मत्स्य व्यवसाय आदी १५१ व्यवसाय सुरू करता येणार आहेत. त्यासाठी नाबार्डमार्फत मोठा निधी मिळणार असून, सहकारी संस्थांनी हे व्यवसाय सुरू केल्यास त्यातून सहकारी संस्था व सभासद शेतकऱ्यांचे हित साधले जाणार आहे. हे १५१ नवीन व्यवसाय सुरू करण्याआधी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना केंद्र सरकारच्या ऑरगॅनिक संघ, राष्ट्रीय बीज सहसमिती व एक्सपोर्ट संघाचे सभासद व्हावे लागणार आहे. त्यासाठी शेअर्स खरेदी करावे लागणार असून, ‘अ’ वर्ग प्राप्त सक्षम सहकारी संस्थेला शेअर्स खरेदीसाठी लागणारी अर्धी रक्कम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्वत: भरेल. तसेच शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन-एफपीओ) स्थापनेसाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून तज्ज्ञांना द्यावी लागणारी रक्कमही कारखान्यातर्फे देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले. बिपीनदादा कोल्हे यांच्या या घोषणेबद्दल कैलास रहाणे यांनी सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले.