[ad_1]
IND VS PAK : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 26 पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवलं. यात पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात भारतीय सेनेला यश आले. त्यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारतीय सेनेने ते परतवून लावले. सध्या भारत -पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून अत्यंत तणावाचे वातावरण आहे. अशातच पुढील काही महिन्यांमध्ये भारत – पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यातील जवळपास 5 सामन्यांबाबत बीसीसीआय (BCCI) नेमका काय निर्णय घेणारा याकडे भारतीय क्रिकेट प्रेमींचं लक्ष आहे.
आशिया कप 2025 :
यंदा सप्टेंबर महिन्यात पुरुष आशिया कप 2025 ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आशिया कपच्या प्रत्येक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एका गटात असतात. त्यामुळे त्यांच्यात एक सामना होणं ठरलेलं असतं. त्यानंतर सुपर 4 साठी दोन्ही संघ क्वालिफाय करण्यात बऱ्याचदा यशस्वी ठरतात. त्यामुळे दोन्ही संघात अजून एक सामना होतो. मात्र भारत – पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमध्ये यंदा आशिया कपचं नियोजन होणार की नाही यावर प्रश्नच आहे. भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी आशिया कपमध्ये पाकिस्तान संघाला वगळण्यात येऊ शकतं अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली होती.
हेही वाचा : युद्धजन्य परिस्थितीत शुक्रवारी भारत – पाकिस्तान मध्ये खेळवण्यात आली मॅच, काळीपट्टी बांधून उतरले खेळाडू
वूमन्स वनडे वर्ल्ड कप:
भारतात आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. यंदा या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025 दरम्यान हा वर्ल्ड कप खेळवला जाईल. ही स्पर्धा रॉबिन राउंड फॉर्मेटने खेळवण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघ स्पर्धेतील इतर संघांविरुद्ध किमान 1 सामना खेळेल. त्यामुळे एक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुद्धा होईल. परंतु याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
टी 20 वर्ल्ड कप 2026 :
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंका आणि भारत यांच्याकडे आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत – पाकिस्तान विरुद्ध किमान एक सामना होतोच. 2026 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप सुद्धा खेळवण्यात येणार आहे. तेव्हा देखील भारत – पाकिस्तान संघ आमने सामने येतात. भारत – पाक यांच्यातील तणावपूर्ण परिस्थतीत बीसीसीआय काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
[ad_2]