[ad_1]
IPL 2025 Playoffs Scenario MI vs DC Match: दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघादरम्यान आज मुंबईमध्ये इंडियन प्रिमिअर लीगचा अत्यंत महत्त्वाचा सामना पार पडणार आहे. या सामन्यावर प्ले ऑफसाठी दोन्ही संघ पात्र होणार की नाही हे ठरणार आहे. मात्र आज मुंबईत होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळेच पाऊस पडला आणि सामना झालाच नाही तर कोणता संघ अधिक अचडणीत येणार याबद्दल चाहत्यांमध्येही संभ्रम आहे. आजचा सामना पावसामुळे झालाच नाही आणि गुण वाटून दिले तर मुंबई इंडियन्सला फायदा होणार की दिल्लीला हे समजून घेऊयात…
तिघे पात्र, एक जागा दोन संघांमध्ये चुरस
अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली यंदाचं पर्व खेळणाऱ्या दिल्लीचा संघ आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफ खेळण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या एकमेव जागेसाठी आमने-सामने आहेत. आतापर्यंत गुजरात, पंजाब आणि बंगळुरुचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळेच अव्वल चार संघांमध्ये येण्यासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये स्पर्धा दिसत आहे. या दोन्ही संघांना त्यांचे उरलेल्या सामन्यामध्ये विजय आवश्यक आहे. मात्र मुंबईच्या तुलनेत दिल्ली अधिक अडचणीत दिसत आहे.
मुंबई, दिल्लीची स्थिती कशी?
दिल्लीच्या संघाला अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपले उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. मात्र आजचा सामना मुंबईत होत असून मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी राज्यातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासहीत जोरदार पाऊस झाला. मुंबईतही जोरदार पावसाने हजेरी लावली. आजही मुंबईत संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता 90 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पाऊस कायम राहिल्यास आजच्या सामन्याचा निकाल लागणार नाही. ही बाब दिल्लीसाठी जास्त चिंतेची आहे.
सामना झालाच नाही तर…
मुंबईला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अॅक्यू वेदरनुसार मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता अधिक असून संध्याकाळी दीड तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडेल. मात्र रात्री पावसाची शक्यता कमी आहे. आजचा सामना पावसामुळे रद्द झाला तर ती मुंबईसाठी आनंदाची बातमी ठरेल. कारण सामना रद्द झाला तर गुण वाटून दिले जातील. मुंबईचा संघ आधीपासूनच दिल्लीपेक्षा एका पॉइण्टने पुढे आहे. दोन्ही संघांना एक एक पॉइण्ट वाटून दिला तर मुंबईचे 15 आणि दिल्लीचे 14 पॉइण्ट्स होतील.
दोन्ही संघांचे शेवटचे सामने एकाच संघाविरुद्ध
दिल्ली आणि मुंबई आपआपले लीग स्टेजमधील अंतीम सामने पंजाबविरुद्ध खेळणार आहेत. पंजाबचा संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे आज मुंबई विरुद्ध दिल्ली सामना झाला नाही. तर मुंबई आणि पंजाबच्या सामन्याच्या निकालावर मुंबई पुढे जाणार की दिल्ली हे निश्चित होईल. मुंबई पंजाबविरुद्ध जिंकली तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडले.
दिल्लीला असलेली एकमेव संधी म्हणजे…
दिल्लीला आजचा सामना रद्द झाल्यानंतरही पात्र ठरायचं असेल तर काही गोष्टी घडणं आवश्यक आहे. साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना मुंबईने गमावला तर दिल्ली प्लेऑफमध्ये जाईल. मात्र यासाठी आज अगदी कमी षटकांचा सामना झाला तरी त्याचा निर्णय लागला पाहिजे आणि दोन पॉइण्ट दिल्लीला मिळाले पाहिजेत ही अट कायम राहील.
[ad_2]