संजीवनीचा उद्योग समूह व संजीवनी फार्मर्स फोरमचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी :-
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत तयार करता येतात. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल, हरितक्रांती-धवलक्रांती नंतर आता भविष्यात नीलक्रांती शेतकऱ्यांचे जीवनमान बदलवणार आहे असे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी फार्मर्स फोरम यांच्या सहकार्याने आयोजित शेतीपूरक व्यवसायातील संधी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे होत्या.
माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की,आज महिलांनी बचतगटांबरोबरच शेतीपूरक व्यवसायातही योगदान द्यावे त्या उत्तम पध्दतीने आर्थिक प्रगती साध्य करू शकतात.”
कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमा पूजन मा.आ.स्नेहलताताई कोल्हे, विवेक कोल्हे आणि मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या हस्ते करण्यात आले.
विवेकभैय्या पुढे म्हणाले की संजीवनी फार्मर्स फोरममार्फत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, विपणन आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत यावर माहिती दिली. मत्स्य शेती,केशर, मशरूम, कोरफड, रेशीम, बांबू यासारखे पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा .
बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नितीन ढसाळ, संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड न्यू व्हेंचर्स संजीव पवार यांनी प्रास्ताविक केले.
मेळाव्याच्या शेवटी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर व इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याचे अभ्यासपूर्ण उत्तर कोल्हे यांनी दिले. आभार बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी मानले.